आजच्या घडीला भारतातील १३५ कोळसा निर्मीत पॉवर प्लांट्स पैकी अर्ध्या प्लांट्सवर केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे.
सिद्धांत दि. ११ ऑक्टोबर २०२१: भारतात होणारे ऊर्जा उत्पादन कोळश्यावर अवलंबून आहे. भारतातील एकूण ऊर्जा उत्पादनापैकी ११२५ टेरावॅट ऊर्जा उत्पादनासाठी कोळश्याचा वापर होतो. आजच्या घडीला भारतातील १३५ कोळसा निर्मीत पॉवर प्लांट्स पैकी अर्ध्या प्लांट्सवर केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. पर्यायाने देशातील औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल इंडिया लिमिटेड हि जगातील सर्वात मोठी कोळशाचे खाणकाम करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीकडून भारताच्या एकूण गरजेपैकी ८४% कोळशाची निर्मिती केली जाते. पण मागणी जास्त असल्याने भारताला कोळसा बाहेरच्या देशांतून आयात करावा लागतो. जगातले सर्वात जास्त कोळशाचे उत्पादनं चीनमध्ये (९१%) होते. त्यानंतर इंडोनेशिया (१४%), Australia (१२.५%) इथे कोळशाचे खाणकाम केले जाते. कोळश्याचा सर्वात जास्त वापर करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पण कोल लिमिटेड इंडिया भारत देशाला लागणार कोळसा पुरेश्या प्रमाणात पुरवठा करण्यात गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून कोळश्याच्या खाणी असलेल्या परिसरात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने कोळश्याचे खाणकाम आणि वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. भारताला पॉवर प्लांट्स मधील कोळश्याचा तुटवडा दूर करण्यासाठी बाहेरील देशातून कोळसा आयात करावा लागणार आहे. पण ते फार खर्चिक ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळश्याचा तुटवडा भासत असल्याने कोळशाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.
ऑल इंडिया पाॅवर इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले कि, भारतामध्ये कोळशाचा एवढा तुटवडा आणि त्यामुळे निर्माण झालेले एवढे मोठे वीज संकट ह्यापूर्वी कधीच आले नव्हते. केंद्राने विशेष पथक स्थापून देशाच्या विविध राज्यात होणाऱ्या कोळश्याच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काही तज्ज्ञांच्या मते खरतर ह्या संकटाची चाहूल गेल्या एप्रिल महिन्यापासूनच लागली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोळसा खाणकाम आणि वीज निर्मिती यांवर अनिष्ट परिणाम झाले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी खाणकामासाठी लागणाऱ्या यंत्रांची डागडुजी, ड्रेनेज यंत्रणा आणि इतर व्यवस्थापनच्या कामात दुर्लक्ष झाल्याने हे संकट ओढवलं असल्याचे जाणकार म्हणतात.