सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, (आर.टी.आय) एक्टचे शिल्पकार न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे दुःखद निधन.
पुणे:- माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.
देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, माहितीचा अधिकार कायदा (आर.टी.आय) एक्टचे शिल्पकार, या देशातील सर्व सामान्यांच्या हक्क-अधिकारांसाठी जीवन समर्पित करणारे क्रांतिकारी समाजसुधारक न्या.पी.बी.सावंत साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक न्या. पी.बी.सावंत साहेबांच्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकीर्दीनंतर भारत सरकारने त्यांची “प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया”चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. न्याय, नियोजन आणि शिस्त या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेले न्या.सावंत साहेबांनी वर्तमानपत्रांना शिस्तीत वागायला शिकविले. अनियंत्रित झालेल्या मिडियाला नियंत्रित केले. त्यांना त्यांचे चारित्र्य जपायला भाग पाडले. आणि “बेंगाल गॅझेटी” या इंग्रजी वर्तमानपत्राने सुरू झालेल्या भारतीय वर्तमानपत्रांच्या सन्मानार्थ 16 नोव्हेंबर हा दिवस “नॅशनल प्रेस डे” म्हणून साजरा केला जावा असा आदेश न्या.पी.बी.सावंत यांनी काढला. कारण प्रसारमाध्यम हे खऱ्या अर्थाने समाजाचे नाक, कान, डोळे आहे अशी त्यांची त्यामागील भूमिका होती . म्हणूनच त्यांच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबर हा दिवस “नॅशनल प्रेस डे” अर्थात “राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिवस” म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली.
ते न्यायाधीश असताना भारतात केवळ एकच न्यूज चॅनेल होते . ब्रॉडकास्टिंग अर्थात प्रसारण आणि प्रक्षेपणाचे सर्वाधिकार हे केवळ दूरदर्शन या सरकारी वाहिनीला होते. त्यांच्या एका न्यायालयीन निर्णयाने भारताच्या ब्रॉडकास्टिंग व्यवहार ज्ञान क्षेत्राचा विस्तार झाला. आज भारतात हजारो चॅनेल्स आहेत. हा त्यांच्या न्यायालयीन निर्णयाचा परिणाम आहे.
“टाइम्स नाऊ” या माध्यमाच्या अर्णब गोस्वामी यांनी मर्यादा रेषा ओलांडल्यावर त्याच्यावर कार्यवाही करण्याचे धाडस न्या.सावंत साहेबांनी दाखविले. अर्णब गोस्वामी पाया पडायला न्या.सावंत साहेब यांच्याकडे आला होता. एक शांत सुस्वभावी परंतू शिस्तबद्ध नीती आणि धोरणांसाठी प्रसिद्ध असलेले न्या.सावंत साहेब न्यायासोबत कधीच तडजोड केली नाही.
न्या.सावंत साहेब न्यायाकडे न्याय म्हणून तर बघतातच पण त्यांच्या दृष्टीने न्याय म्हणजे केवळ न्याय नाही तर तो सार्वजनिक चारित्र्याचा भाग आहे . मूलभूत अंग आहे .
त्यांचे हे गुण बघून “वर्ल्ड प्रेस कौन्सिल ( लंडन )” ने त्यांची वर्ल्ड प्रेस कौन्सिल ( लंडन ) चे प्रेसिडन्ट म्हणून नियुक्त केले. तिथे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्रांवर आणि बीबीसी सारख्या जागतिक माध्यमांवर नियंत्रण आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा न्या. पी.बी.सावंत साहेबांचा अनुभव आहे.
या जागतिक कीर्तीच्या महामानवाने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष असताना “Right to information”ची संकल्पना सर्वप्रथम अधिकृतरित्या मांडली. आणि त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन, प्रशासकीय अनुभवाच्या आणि प्रचंड अभ्यासाच्या जोरावर “Right to information Act” अर्थात माहितीचा अधिकार कायदा” खऱ्या अर्थाने अंमलात आला. माहितीच्या अधिकार कायद्याचे अक्षर आणि अक्षर लिहिण्याचे महान कार्य न्या.सावंत साहेबांनी केले. ज्येष्ठ भारतीय पत्रकार अरुणा रॉय यांनी त्यांच्या एका भाषणात भारताच्या माहिती अधिकार कायद्याचे शिल्पकार म्हणून न्या.पी.बी.सावंत साहेबांचा उल्लेख केला .
आज “नॅशनल प्रेस डे” आहे. आज आपल्यापैकी अनेकांना नॅशनल प्रेस डे चे जनक कोण ? हे अनेकांना माहिती नाही . त्यांनी न्या.सावंत साहेब यांचे आभार मानले पाहिजे की, त्यांनी भारतीय वर्तमान पत्रांचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जावा यासाठी विशेष कायदेशीर तरतूद करून घेतली. मा.न्या.सावंत साहेब यांना त्यांच्या या आणि अनेक कार्यासाठी भारत कायम लक्षात ठेवेल .