जो शाहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी
मनोज कांबळे
मुंबई दि. २६ जुलै २०२१: कारगिल युद्धाला आज २२ वर्षे पूर्ण होत आहेत. मे ते जून १९९९ च्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान मध्ये कारगिल युद्ध लढले गेले होते. कारगिल मधील उणे ४० अंश सेल्सियस तापमानात १४ ते १८ हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर भारतीय सैनिकानी पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि २६ जुलै १९९९ ला पाकिस्तानचा पराभव गेला. हे युद्ध जागतिक लष्करी इतिहासामधील एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.
कारगील, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. या चौक्यांवर कडक हिवाळ्यात दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता. १९९९ मध्ये पाकिस्तानने हा समझौता तोडला. तिथूनच युद्धाची ठिणगी सुरु झाली.
१९९८-१९९९ च्या हिवाळ्यात दहशतवाद्यांच्या वेशात पाकिस्तानी सैनिकानी कारगिलमध्ये प्रवेश केला. या पाकिस्तानी लष्कराने या ऑपरेशनला “ऑपरेशन बद्र” असे नाव दिले होते.
३ मे रोजी कारगिलमधील स्थानिक मेंढपाळाने भारतीय सैन्याला पाकिस्तानी घुसखोरांबद्दल माहिती दिली. या रिपोर्टची शहानिशा करण्यास गेलेल्या ५ भारतीय सैनिकांची पाकिस्तानी सैन्याकडून हत्या करण्यात आली. त्यावर प्रत्युउत्तर म्हणून भारतीय लष्कराने जवळपास २ लाख सैनिकांच पथक तयार केलं.
भारतीय लष्कराने आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीयांच्या मदतीने पाकिस्तानच्या घुसखोरीला जोरदार उत्तर दिल आणि २६ जुलै १९९९ ला पाकिस्तानचा पराभव गेला. भारतीय लष्कराने या ऑपरेशनला “ऑपरेशन विजय” असे नाव दिले होते. भारतीय एअरफोर्स ने “ऑपरेशन सफेद सागर” द्वारे पाकिस्तानी लष्करावर हवाई मार्गाने हल्ले चढवले. भारतीय नेव्हीने सागरी मार्गाने पाकिस्तानची कोंडी केली होती. त्यांनी पाकिस्तानच्या कराची सारख्या मोठ्या बंदरांवर पाळत ठेवण्यात आली असल्याने पाकिस्तानचा सागरी मार्गाने होणार व्यापार रोखण्यात आलं होता. पाकिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली होती त्यांच्याकडे फक्त सहा दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक होता.
कारगिल युद्धामध्ये टायगर हिल चौकीवर घनघोर लढाई झाली होती. शीख, ग्रेनेडियर आणि नागा रेजिमेंट्स ने १००० फुटच्या उंचीच्या शिखरावर चढाई करून १२ तासाच्या लढाईनंतर पाकिस्तानी सैनिकांच पराभव केला होता. पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने सुरुवातीला भारतातील घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना जबाबदार मानले होते. परंतु भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याकडून जप्त केल्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तान लष्कराचा घुसखोरीमागचा सहभाग जगासमोर आला होता.या युद्धाच्या वेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अणुशक्ती होती. अणुशक्ती हत्यार असलेल्या दोन देशांमध्ये घडलेलं हे जगातील पहिलच मोठं युद्ध होत
या युद्धामध्ये पाकिस्तानचे जवळपास चार हजार सैनिक मृत्युमुखी पडले होते. भारताचे ५२७ सैनिक शाहिद झाले होते तर १३६३ जण जखमी झाले होते. कारगिल युद्धामध्ये दाखवलेल्या शोर्यासाठी भारतीय लष्करातील ४ जणांना परमवीर चक्र आणि ११ जणांना महावीर चक्र देऊन गौरवण्यात आले होते.
कारगिल युद्धाच्या स्मरणार्थ तोलोलिंग हिलच्या पायथ्याशी भारतीय लष्कराने २००४ साली स्मारक उभारले. या स्मारकावर कारगिल युद्धात शाहिद झालेल्या सैनिकांच नाव कोरण्यात आली आहेत. स्मारकाला लागून असलेल्या संग्रहालयामध्ये कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचे फोटोग्राफ्स, युद्धातील महत्वाचे कागदपत्र आणि विडिओ, विविध हत्यार आणि उपकरणे प्रदर्शनास ठेवण्यात आली आहेत.