स्पॉटलाईट: फास्टफूड आरोग्यास घातक
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व पदार्थांचा समावेश असावा असे आहार शास्त्र सांगते. पण धावपळीच्या सध्याच्या काळात लोकांना स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी वेळ नाही मग आधार घेतला जातो तो फास्टफूडचा. झटपट तयार होणारे आणि जिभेला हवेहवेसे हे पदार्थ सध्या भरपूर खपतात.
हे पदार्थ जरी जिभेला हवेसे वाटत असेल तरी ते प्रकृतीला चांगले नसतात. त्यात खूप मीठ व साखर असते शिवाय ते भरपूर तळलेले देखील असतात. अतिप्रक्रिया केलेल्या या पदार्थात कोणतेही पौष्टिक घटक नसतात त्यामुळे या पदार्थांपासून दूर राहावे असा सल्ला डॉक्टर देत असतात तरी लोक त्यांचे ऐकत नाही. मागील वर्षी एका फास्टफूड तयात करणाऱ्या कंपनीने हे मान्य केले होते की ही कंपनी तयार करत असलेल्या ६० टक्के खाद्यपदार्थात आणि शितपेयांमध्ये शरीराला पौष्टिक असे काही नाही. या कंपनीचे नूडल्स, कॉफी हे दोन पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. शिवाय चॉकलेट, केक, पास्ता, केचप, सूप, वेफर्स, कुरकुरे यासाखरे विविध पदार्थ ही कंपनी बनवते.
विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पालकही मुलांच्या हट्टापायी हे पदार्थ मुलांना देतात. मुले हे पदार्थ मिटक्या मारत खातात. कंपनीने या पदार्थात कोणतेही पौष्टिक घटक नसल्याचे मान्य करूनही पालक फास्टफूडचा हट्ट सोडत नाही. काही फास्टफूड पदार्थात तर शरीरास हानिकारक असे घटक असतात. तज्ज्ञांनी ते संशोधनाअंती सिद्ध करून दाखवले आहे. ज्या फास्टफूड पदार्थात शरीरास हानिकारक असलेले पदार्थ असल्याचे सिद्ध झाले ते पदार्थ बनवणाऱ्या कंपनीने नंतर ते हानिकारक घटक काढून टाकल्याचे सांगितले मात्र अजूनही काही फास्टफूड पदार्थात शरीरास घातक असलेले अपायकारक घटक आहेत हे कोणीही नाकारू शकणार नाही.
पेप्सीको आणि मॅकडोनाल्ड यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांवर असे आरोप अनेकदा झाले आहेत. तरीही या कंपन्यांच्या फास्टफूड पदार्थांची लोकप्रियता कमी झालेली नाही उलट वाढतच चालली आहे. फास्टफूडमुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अतिप्रमाणात फास्टफूड खाण्यात आल्यास हृदयरोग, टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि स्थौल्याचा धोका आहे त्यामुळे पालकांनी मुलांना फास्टफूड पासून दूर ठेवायला हवे. फास्टफूड ऐवजी दूध, पोळी, पराठे, चटणी, कडधान्याच्या उसळी, पोहे, उपमा यासारखे पौष्टिक पदार्थ पालकांनी मुलांना खायला द्यावे. मुलांना चविष्ट पदार्थ देण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खायला देणे ही पालकांची जबाबदारी आहे.