फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत :जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अमरावती : – संत्रा फळपीक जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. संत्र्याची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे व फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी चमू तयार करून गावे दत्तक घ्यावीत व शेतक-यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज अचलपूर येथे केले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी संशोधन केंद्रातर्फे अचलपूर येथे संत्रा फळगळ नियंत्रण व बीजोत्पादन कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक गटांना मार्गदर्शन करावे. या प्रक्रियेत सातत्य ठेवावे जेणेकरून शास्त्रीय उपाययोजनांतून संत्रा फळगळ नियंत्रित करता येईल. शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीसंबंधी समस्या कृषी शास्त्रज्ञ, संशोधक किंवा कृषी अधिकारी यांच्यासमक्ष मांडाव्या. तज्ज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास संत्रा उत्पादन वाढीस चालना मिळेल. एखाद्या परिसरात पीक रोगाच्या संक्रमणाची माहिती मिळताच कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुचवितानाच इतर ठिकाणीही माहिती प्रसारित केली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले.
श्री. भाले म्हणाले, पिकांचे नियोजन, खतांचे व्यवस्थापन या तांत्रिक बाबींची माहिती संत्रा उत्पादकांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन व जनजागृतीसाठी यापुढेही तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबविण्यात येईल. श्री. गाडे, श्री. वानखडे यांचीही भाषणे झाली. संत्रा फळगळ रोखण्यासाठी मार्गदर्शनपर घडीपत्रिकेचे व केळी लागवडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.