सिलेंडरचा वाढता भाव: प्रदुषणमुक्त होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशाची अडचण 

अंकुश शिंगाडे

 नागपूर

मो: ९३७३३५९४५०

अलीकडे सिलेंडरची भाववाढ होत आहे. ही भाववाढ प्रदुषण मुक्त असलेल्या देशाला अडचणीची ठरत आहे. यावर वेळीच पावलं उचलली गेली नाहीत तर उद्या प्रत्येक गृहिणी स्वयंपाक शेगडीवर करेल व प्रदुषण मुक्त देशाची कल्पना साकार होणार नाही.

सध्या महागाई वाढतच वाढत चालली आहे. ती महागाई केवळ सामान्य लोकांनाच छळत नाही तर गरीबांनाही छळत आहे. तशीच ती महागाई घरातील गृहिणींनाही छळत आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

गृहिणी……गृहिणी घरी स्वयंपाक करतात. त्या कशा स्वयंपाक करतात, हे न सांगितलेलं बरं. कारण त्यांना जो त्रास होतो, त्या त्रासाचं वर्णनच करता येणं शक्य नाही. 

 हं, आता कोणी म्हणतील की गृहिणींना कोणता त्रास होतो? आयतं मिळते ना सिलेंडर स्वयंपाक घरात. तसेच नवरोबा सर्वच वस्तू घरात आणून देतात ना वरचेवर. तसंच आता राशनही राशनदुकानातून नि:शुल्क मिळतं. मग कोणता त्रास होतो बरे? यावर विचार मांडतांना मी एवढंच सांगणार की त्रास होतो. महाभयंकर त्रास होतो. परंतू जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे गृहिणींना जो त्रास होतो, तो आपल्याला दिसत नाही. 

अलिकडे सर्वांना राशन दुकानातून गहू आणि तांदूळ फुकटात मिळत आहे. याचा अर्थ आपल्याला आवळा मिळत आहे. बदल्यात पोवळा काढून घेतल्यागत मुख्य म्हणजे स्वयंपाकाचा सिलिंडर महाग करीत आहे. तो सिलिंडर गरीबांनाही कमी पैशात मिळत नाही. सबसिडी नाहीच्या बरोबर आहे. ही सिलिंडरची महागाई सांगीतली तर लोकं म्हणतील की तांदूळ गहू फुकटात मिळत आहे, तरी कुरकूर. ही कुरकूर संपणारच नाही कधी सर्वच फुकटात दिलं तरी. परंतू मला हे म्हणायचं आहे की ह्या सर्व वस्तू फुकटात मिळतात. त्या मिळतात कोणाला? जर याचा रितसर सर्वे केला तर तो तांदूळ गहू धनिकांना मिळत आहे. जो निःशुल्क मिळणारा तांदूळ गहू घराकडे नेवून तो व्यापारांना कमी भावात विकला जातो.

तसंच राशननकार्डवाल्यांचा सर्वे केल्यास असे बरेचसे कार्डधारक मिळतील की जे गरीब नाहीत. तसंच अशी बरीचशी मंडळी मिळतील की जे गरीब आहेत. परंतू त्यांचेकडे राशनकार्ड नाही. कारण ते मुळात हुशारच नाहीत. हुशार कोण असतो?याचा जर विचार केला तर धनीक हाच घटक जास्त हुशार आहे, जो या योजनांचा लाभ घेतो. गरीब नाही. 

सिलिंडर बाबत सांगायचं झाल्यास मुख्य बाब ही सांगावी लागेल की ती अन्याय सहन करणारी बाई, ज्या घरात पती दारुडा आहे. तो अग्रावर अतोनात पैसा खर्च करतो. त्याच्या घरी सिलिंडर तर असतो. परंतू तो भरायला पैसा नसतो. तो पैसा व्यसनात जातो. अहो, या काळात अशा घरातील माणूस व्यसनापायी घरातील सामान विकतो. त्याच्या पत्नीनं ठेवलेले पैसे चोरतो. त्या घरात ती स्री सिलेंडर घ्यायला पैसा कुठून आणेल? मग ती स्री सिलेंडरचा हंडा तसाच ठेवून कमी पैशात असलेल्या काड्या वा भुसा आणते व आपला परीवार कसा तरी जगवते. खरं तर त्या घरी सिलेंडर निःशुल्क द्यायला हवं. निदान निःशुल्क मिळणारा गहू, तांदूळ निःशुल्क शिजवता यावा व कसंतरी चटणीमीठावर अशा गृहिणींना आपल्या लेकरांना जगवता यावं हा उद्देश. परंतू अलीकडे सिलेंडरच दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे. तो सिलेंडर साधी पूर्णतः गरीब असलेली स्री घेवू शकत नाही. त्यामुळं ‘धूर मुक्त देश’ वा ‘प्रदूषणमुक्त देश’ ही जी देशाची वा प्रगतीशील भारताची संकल्पना आहे, ती फोल ठरत चालली आहे. 

अलीकडे सिलेंडरचे भाव गगणाला भिडणारे असेच झाले आहेत. सन २०२२ च्या २२ मार्च ला ५० रु. ७ मे ला ५० रु. १९ मे ला २.५० रु. ६ जुलै ला ५० रु. आणि आता दि. २ मार्चला ५० रुपये वाढत आहे. म्हणजेच वर्षभरात सिलेंडर एकशे दोन रुपये पन्नास पैशानं वाढला.

 दरवेळी भाववाढ होत आहे. त्यात सिलेंडरचीही भाववाढ होत आहे. तसं पाहता पैसा हा कोणत्या कोणत्या गृहिणी स्वतः कमवीत नसल्यानं त्यांचेजवळ राहात नाही. त्यामुळं त्या सिलेंडरला पडणारे जास्त दाम देवून सिलेंडर घेवू शकत नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास चूलच फुंकावी लागते. याचाच अर्थ असा की प्रदूषणमुक्त वा धूर मुक्त देशाची कल्पना जी मांडली जाते. त्या कल्पनेला फाटा फुटतो. यावर महत्वाचं सांगायचं सिलेंडर कंपन्यांनी यावर ठोस पावले उचलून सरकारला सुचीत करावं आणि त्यावर योग्य असा निर्णय घेवून सिलेंडरच्या किमती कमी कराव्यात. जेणेकरुन सिलेंडर सर्व गृहिणींना वापरता येईल. तसंच धूर मुक्त भारत वा प्रदुषण मुक्त देशाची कल्पना साकार होईल एवढंच सांगणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here