महाराष्ट्राचा विकास गतीशील व्हावा

54

महाराष्ट्राचा विकास गतीशील व्हावा

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

महाराष्ट्र दिवस मराठी भाषीकांसाठी आनंदाचा व गौरवाचा दिवस आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.तेव्हापासुन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व थाटाने महाराष्ट्र दिवस साजरा केल्या जातो.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राजकीय पुढाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा,शुरविरांचा, क्रांतिकारकांचा,थोरमहात्म्याचा व साधुसंतांची पावन भूमी आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून जनतेला (प्रजेला) कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी संपुर्ण राजकीय पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी व पक्ष-विपक्षनी स्वीकारून जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण शक्तीनीशी कार्य करण्याची गरज आहे.तेव्हाच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यास मोठी मदत होईल व विकास भरभराटीला येईल.

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राची संपूर्ण धुरा राजकीय पुढाऱ्यांच्या हातात आहे.सत्ताधाऱ्यांनी विकासाची कामे करणे व कोणते काम करायचे आहे हे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सांगणे.अशाप्रकारचे हे राजकीय चक्र असायला हवे.परंतु सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासापेक्षा सत्तेच्या लोभापायी पक्ष-विपक्षाचे राजकीय पुढारी एकमेकांची उखाड-पाखाड करतांना दिसत आहे.त्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटत आहे.त्याचे प्रायचित्य राज्यांच्या 12 कोटी 94 लाख जनतेला भोगावे लागत आहेत.महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, कुपोषण, कामगारांच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या असे अनेक ज्वलंत प्रश्न आहे.परंतु राज्यात संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांचे वाकयुध्द सुरू आहे.या वाकयुध्दाशी राज्यांच्या जनतेला काहीही देणेघेणे नाही.परंतु राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या यावर जनतेचा होहल्ला होवू नये यासाठी राजकीय पुढाऱ्यांची ही वाक युध्दाची खेळी खेळत असावी असे मला वाटते.

राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्र दिनाला कोणतेही राजकीय वळण येणार याची काळजी घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक पक्षाचा राजकीय पुढारी आपली पोळी कशी शेकता येईल या उद्देशाने आपली खेळी खेळत आहे.परंतु यात राज्याचा नागरिक भरडतो आहे.आज महाराष्ट्रात अनेक गंभीर समस्या आहेत सुर्य तळपतो आहे यामुळे पाण्याची समस्या आणि आता अकाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या समस्या जन्म घेतांना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व प्रजेची सेवा केली.परंतु आज महाराष्ट्राचा राजकीय पुढारी गर्भश्रीमंत झाल्याचे दिसून येते.परंतु प्रजा मात्र गरीबीतच मरत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात असे चित्र निर्माण झाले आहे की “राजकीय पुढारी तुपाशी आणि महाराष्ट्राची जनता उपाशी”.

महाराष्ट्राच्या राजकीय पुढाऱ्यांनी मनात ठानले राज्याचा विकास भरभराटीला येवु शकतो.याकरीता राजकीय पुढाऱ्यांजवळ असलेली चल-अचल संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणली पाहिजे यामुळे महागाई, बेरोजगारी, कुपोषण, शिक्षणाचा अवाढव्य खर्च,शेतकऱ्यांच्या समस्या याला आळा घालण्यास मोठी मदत होईल.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी शपथ घेतली पाहिजे की राज्याच्या कठीण घडीला आपले संपूर्ण मतभेद विसरून महाराष्ट्राच्या 12 कोटी 94 लाख  जनतेसाठी  युध्दपातळीवर तन,मन, धनाने प्रयत्न करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.सोबतच महाराष्ट्रातील जनतेला सन्मानजनक वागणुक दिली पाहिजे.यातच खरा महाराष्ट्र दिवस साजरा केल्याचे दिसून येईल.देशातील व महाराष्ट्रातील बदलते हवामान पहाता आज महाराष्ट्राच्या विकासासोबत पृथ्वीला व निसर्गाला वाचविण्याचे दायित्व संपूर्ण जनतेवर आहे.

त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या संपूर्ण जनतेनी व राजकीय पुढाऱ्यांनी एकतरी झाड लावुन महाराष्ट्र दिवस साजरा करायला हवा.यामुळे महाराष्ट्रातील हवेतील वातावरण शुद्ध राहिल, ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल, गुरांना चारा मिळेल, पशुपक्ष्यांना शुद्ध हवा मिळेल अशाप्रकारे जिवसृष्टी आल्हाददायक वातावरणात वावरतांना दिसेल. महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !