गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाचे आदेश
शासनाविरुद्ध दावा दाखल करणाऱ्या ॲड.उपाध्ये यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग:मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते पोलादपूर या नवीन बांधण्यात आलेला रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याची तक्रार ॲड.अजय उपाध्ये यांनी केली आहे. या महामार्गावरील रस्ता खराब असल्याने सतत अपघात होत आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता ॲड.उपाध्ये यांनी या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे .या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार योग्य कारवाई करावी असे आदेश केंद्रीय रस्ते परिवार आणि महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे कोकण भुवन येथील प्रादेशिक अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता यांना कारवाईचे आदेश दिले .
सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे सदस्य ॲड.अजय उपाध्ये येथील जिल्हा न्यायालयात 2016 मध्ये दिवाणी दावा दाखल करून गोवा राष्ट्रीय महामार्ग सह रायगड जिल्ह्यातील प्रमुख रस्ते योग्य प्रकारे होण्याकरिता याचिका केली आहे. हा दावा आजही प्रलंबित आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते पोलादपूर या टप्प्यात खड्डे, आरसीसी क्रॅक्स असल्याने हा महामार्ग मानवी वापरात अयोग्य असणे तसेच हा महामार्ग नियोजित नकाशा आणि ड्रॉइंग प्रमाणे नसल्याबाबत पण बाबतची परिस्थिती संबंधित पुराव्यासह या दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात मांडली होती.नव्याने करण्यात आलेला आर.सी.सी चा पळस्पे येथे पोलादपूर दरम्यान चा महामार्ग आणि ठिकाणी आर.सी.सी. फुटून त्याला खड्डे असल्याने तो वाहतुकी करतात धोकादायक असल्याचे देखील न्यायालयात नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या दाव्यामध्ये स्थापत्यशास्त्र तज्ञ पी. एन. पाडलीकर यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोर्ट कमिशनर पाडलीकर यांनी एक व दोन फेब्रुवारी 2022 रोजी पळस्पे ते पोलादपूर या रस्त्याची (एनएचओआय 66) ची पाहणी करून न्यायालयास अहवाल सादर केला होता.त्यात हा महामार्ग वाहतुकीस धोकादायक असल्याचे विविध निष्कर्ष आधारे नमूद केली आहे.कोर्ट कमिशनर पाडलीकर यांच्या अहवालानंतर देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाने गोवा महामार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाही. दरम्यान सन 2017 ते 2024 या सात वर्षाच्या कालावधीत पळस्पे ते पोलादपूर या महामार्ग टप्प्यात एकूण 2730 अपघात झाले.या अपघातामध्ये 931 प्रवाशांचे मृत्यू झाले.तर 1132 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील अनेकांना कायम अपंगत्व आले .तर अन्य 2457 प्रवासी जखमी झाले आहेत.
या सर्व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करावी. आणि कोकणवासीयांचे प्राण वाचवावे याकरिता ॲड.अजय उपाध्ये यांनी गेल्या 14 मे 2024 रोजी तत्कालीन केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन दीड महिन्यानंतर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी हे आदेश दिले आहेत.