‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांना नाउमेद होण्याची वेळ येणे हा शासनाचा सपशेल पराभव – डॉ. अभिलाषा गावतुरे
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 2 ऑक्टोंबर
राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेद या योजनेची निर्मिती करण्यात आली व त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उमेदच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. शासनाची ही योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या बारा वर्षापासून उमेदचे महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी अविरतपणे करीत आहेत. शासनाच्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची धुरा याच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.परंतु नियमित आस्थापना नसल्यामुळे उमेदच्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होऊन उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा पराभव आहे. असे मत डॉ. अभिलाषा गावतूरे यांनी व्यक्त केले. एकीकडे जंगलासाठी ,जंगली जनावरांसाठी स्वतंत्र वनविभाग असून त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आस्थापना आहे परंतु गरिबीचे निर्मूलन करण्याच्या उद्देश्याने असलेली एवढी भव्य योजना माणसांच्या विकासासाठी असून त्यात राबणाऱ्या कर्मचाऱ्यांची विस्थापना होणे ही फार मोठी शोकांतिका आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघठनेच्या वतीने प्रलंबीत मागण्याबाबतीत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघठनेच्या प्रलंबीत मागण्याबाबत समस्या जाणून घेत आंदोलनाला पाठींबा दर्शविला.