राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांची अनलोक बद्दल पत्रकार परिषद
आणि काही तासातच अनलोक बदल काही विचार झालेला नाही असे स्पष्ट
त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आधी पत्रकार परिषद घेऊन ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच राज्य सरकराने अनलॉकचा निर्णय झालेला नसून प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे राज्य सरकारमध्येच या निर्णयावरून गोंधळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा विजय वडेट्टीवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. मात्र, यंदा बोलताना त्यांनी निर्णयामध्ये ‘तत्वत: मान्यता’ असा शब्द टाकून आपली बाजू मांडली आहे. “गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीमध्ये ५ टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. लॉकडाउन लागू करणं ही सरकारची जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेनं सहकार्य केलं, त्या भागातला लॉकडाउन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरवलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्याचं ठरलं आहे. याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील”, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.