गावकर्यांचा मोबाईल टॉवरला विरोध अन नगरपंचायतला मोबाईल टॉवर कंपनीची चिंता.
आशीष अंबादे प्रतिनिधी
सेलू:- येथील प्रभाग 5 देवतारे ले आऊटमध्ये नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला लेखी विरोध करूनही मोबाईल टॉवरला परवानगी दिली आहे. टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात होताच संतप्त नागरिकांनी काम हाणून पडले असून बळजबरीने टॉवर उभाण्याचा प्रयत्न होत आहे. टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
लोकवस्ती असलेल्या प्रभाग 5 मध्ये गणपत जवादे यांच्या 800 चौरस फूट असलेल्या खाली प्लॉटमध्ये सहा महिन्यांपासून एरटेल कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहे. टॉवर उभे करू नये यासाठी प्रभागातील नागरिकांनी 6 महिन्यांपूर्वी नगर पंचायतला निवेदन दिले आहे. त्यानंतरही नगरपंचायतच्या तत्कालीन पदाधिकार्यांनी त्या टॉवरचा विषय अजेंड्यात घेत चुपचाप जाहीरनामा काढला. सदर जाहिनाम्यात दिलेला आक्षेपाचा कालावधी संपण्यापुर्वीच आक्षेपांचा विचार न करता टॉवर उभारण्याची परवानगी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिली. त्या जाहिरनाम्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदवित टॉवरला प्रखर विरोध केला. परवानगी देताना नगरपंचायतची कृती संशयास्पद असून नागरिकांचा प्रखर विरोध आणि आक्षेप असताना आरोग्यास धोकादायक असलेले मोबाईल टॉवर उभारण्यास नगर पंचायत प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे प्रभागातील गणपत जवादे यांचा मालकीचा 800 चौरस फूट प्लॉट लोकवस्तीच्या अगदी मध्यभागी आहे. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी या टॉवरची प्रकिया सुरू झाली होती, नगरपंचायत प्रशासनाने याबद्दल हरकती मागविल्या होत्या लगेच मुदतीच्या तारखेत येथील नागरिकांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन आक्षेप नोंदविला होता. परंतु, नागरिकांच्या विरोधाला न जुमानता हा टॉवर मंजूर कसा झाला याबद्दल नागरिकात उलटसुलट चर्चा आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होऊन सदर कामाला मंजुरी देण्यात आली असा आरोप नागरिकाकडून होत आहे. नगरपंचायत जनतेसाठी की मोबाईल कंपनीसाठी असा सवाल उपस्थित केला जात असून हा मोबाईल टॉवर उभारून प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत आहे काय, असा गंभीर प्रश्न प्रभागातील बबन पोहाणे, सुनील वांदिले, घनश्याम चावरे, चंद्रशेखर वंजारी, रामदास जेवरे, सूर्यभान सावरकर, शरद चवळीपांडे, अशोक खेकडे, शरद किरमे, ताराचंद पोपटकर, देवराव कोहाड, दीपक भिसे, ज्ञानेश्वर भिलकर, विष्णू पारिसे, मधुकर तेलंग, शुभम पारिसे आदी नागरिकांनी केला आहे. टॉवर उभारणीचे बांधकाम थांबले नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन डाव हाणून पाडू असे नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन याची चौकशी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.