औरंगाबादेतील पठारे कासच्या धर्तीवरच करणार ‘झकास’ :डॉ. मंगेश गोंदावले.
पर्यावरण दिनी जवळपास करणार 20 हेक्टरवर गवत पुष्पांचे रोपन; पर्यावरणपूरक व्यवसाय निर्मितीवर राहणार भर
🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका) : पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या ठिकाणी पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवर जिल्ह्यातील जवळपास 20 हेक्टरवर पाच विविध ठिकाणी गवत पुष्पांचे रोपन जागतिक पर्यावरण दिनी (5 जून) करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठारला युनेस्कोने हेरिटेज दर्जा बहाल केला आहे. कास पठाराप्रमाणेच औरंगाबादेतील काही भागात तुरळक प्रमाणात पुष्पवृक्ष दिसतात. याच गवत पुष्प, पुष्प वृक्षांच्या संख्येत कास पठारावरील 70 ते 80 प्रकारच्या प्रजातींची भर घालण्यात येईल. तीन टप्प्यात ‘झकास पठार’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प जिल्हा परिषदेकडून आगामी सात वर्षात राबविण्यात येणार आहे, त्याचाच हा पहिला टप्पा आहे. तीन टप्प्यातील या प्रकल्पाचा मुख्य हेतू पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देणे. सुरूवातीच्या पहिल्या टप्प्यात पुष्प गवतांची लागवड करणे, त्यानंतर पुष्पवृक्ष आणि शेवटी वनौषधींची लागवड करण्यावर भर देण्यात येईल, असेही डॉ. गोंदावले म्हणाले.
या पर्यावरण दिनी 70 ते 80 प्रकारच्या गवत पुष्पांच्या रोपनासाठी 300 किलो बिया आणण्यात आलेल्या आहेत. या बियांचे जवळपास 20 हेक्टरवर रोपन करण्यात येणार आहे. आगामी काळात यामुळे पर्यटकांमध्ये वृद्धी होऊन पुष्प गवत, वृक्षांमुळे पर्यटकांना समाधान लाभेल, स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही डॉ. गोंदावले म्हणाले.
या पाच ठिकाणी होणार रोपन जिल्ह्यातील गौताळा, भेंडाळा, सारोळा, व्हीव पॉईंट आणि शहरातील गोगाबाबा टेकडी येथे कास पठारावरील पुष्प गवतांचे रोपन करण्यात येणार आहे, असे डॉ. गोंदावले म्हणाले.