ई- कचऱ्याविषयी जागरूकता हवी…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

आपल्या रोजच्या जगण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल सेवांचा वापर जसा वाढत चालला आहे तसतसा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा डोंगरही वाढतो आहे. उपयुक्तता संपलेल्या किंवा तांत्रिक बिघाडामुळे वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तू फेकून दिल्या जातात आणि मग त्याचा ई कचरा बनतो.

हेच पहा ना आता लवकरच 5 जी तंत्रज्ञानाने युक्त मोबाईल लवकरच बाजारात येतील. रिलायन्स जिओ सह अनेक कंपन्यांनी त्याची चाचणी घेतली असून ती यशस्वी झाली आहे त्यामुळे लवकरच सर्वांच्या हातात 5 जी मोबाईल दिसतील. पण हे मोबाइल आल्यावर सध्या वापरात असलेले अब्जावधी मोबाईल अडगळीत पडतील. अडगळीत पडलेल्या या अब्जावधी मोबाईलची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न भारतात आगामी दोन ते तीन वर्षात उभा राहणार आहे. ई कचऱ्याची ही समस्या केवळ भारतातच आहे असे नव्हे तर जगातील सर्वच देशात आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने ग्लोबल ई वेस्ट मॉनिटर २०२० नावाचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार २०१९ या वर्षात जगभरात ५.३६ कोटी मॅट्रिक टन ई कचरा तयार झाला आहे. या अहवालानुसार चालू दशकाच्या अखेरपर्यंत हा आकडा ७. ४ कोटी मॅट्रिक टनापर्यंत जाईल. भारताचा विचार केला तर २०१९ या वर्षात भारतात १० लाख १४ हजार ९६१ टन इतका कचरा तयार झाला. एकट्या दिल्लीत हे प्रमाण २ लाख टन इतके आहे.ही आकडेवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेच दिली आहे. ई कचऱ्याची इतकी गंभीर समस्या आ वासून उभी असतानाही आपण ई कचऱ्याविषयी जागृत नाही. काहींना तर ई कचरा म्हणजे काय हे देखील माहीत नाही.

ई कचरा म्हणजे तुमच्या आमच्या घरातील निकामी झालेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या सहजपणे आपण इतर कचऱ्यासोबत बाहेर फेकतो. या कचऱ्याच्या निचरा देखील आपण इतर कचऱ्याप्रमाणेच करतो. घरगुती वापरातील टीव्ही, टेप, रेडिओ, सीडी, व्हीसीडी, फ्रीज, वाशिंग मशीन, कुलर, एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक कुकर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, हिटर, पंखे यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या की त्याला ई कचरा असेंल्प संबोधले जाते. याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपकरणे जशी, संगणक, मोबाईल, लॅपटॉप, फोन, बॅटरी, सर्किट बोर्ड, हार्ड डिस्क इत्यादींचा ई कचऱ्यात समावेश होतो. अशा प्रकारे निकामी झाल्याने फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ई कचरा असे म्हणतात.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये भरपूर प्रमाणात सजीवांना अपायकारक घटक असतात. हे घटक पर्यावरणातील हवा आणि पाण्यात मिसळले की सभोवतालची हवा, पाणी आणि माती दूषित होती. मोबाईलच्या किंवा कोणत्याही बॅटरीची निर्मिती शिसे वापरून केली जाते. हे शिसे पावसाच्या पाण्यात झिरपून हवेतील आद्रतेमध्ये मिसळून संबंधित हवा, पाणी आणि माती दूषित करते.

अमेरिकेतील एका पर्यावरण संवर्धन संस्थेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी सुमारे तीस दशलक्ष संगणक निकामी झाली म्हणून फेकून दिले जातात. यांपैकी वीस टक्क्यांहुन कमी संगणकाचे पुनर्विनिकरण केली जाते. युरोपमध्ये तर ददरवर्षी सुमारे शंभर दशलक्ष फोन फेकून दिले जातात. कालबाह्य ठरलेली, फेकून दिलेली ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे पर्यावरणातील जागा वेगाने व्यापत आहेत. निष्काळजीपणे फेकलेल्या काही उपकरणांमध्ये बोरिलीयम, कॅडीमीयम, पारा आणि शिसे यासारखी घातक घटक असतात. या घटकांना वातावरणात संमिश्र होण्यास अवकाश लागत असला तरी खूप जास्त प्रमाणात जेंव्हा हे वातावरणात मिसळले जातात तेंव्हा पर्यावरणाची मोठी हानी होते. एकूणच ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे हे लक्षात घेता ई कचऱ्याच्या समस्यावर वेळीच आणि गांभीर्याने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.

ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे. त्याचा निचरा इतर कचऱ्यासोबत न करता त्याचा निचरा करण्यासाठी भिन्न प्रक्रिया राबवली पाहिजे. ई कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत या कचऱ्याचे संकलन, त्याचे रिसायकलिंग आणि त्याचे री – मॅन्युफॅक्चरिंग महत्वाचे आहे त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने संयुक्त रुपात पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील.

पर्यावरण मंत्रालयाद्वारे सादर केलक्या ई कचरा व्यवस्थापन नियम २०२२ च्या मसुद्यात ई कचरा व्यवस्थापनामध्ये उत्पादक, पुनर्वापर संस्था आणि संघटना सर्वांची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. ती जबाबदारी प्रत्येक घटकाने पार पाडल्यास काही प्रमाणात ही समस्या मिटेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here