आंबेडकरी चळवळीतील कवी – गायक जनीकुमार कांबळे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
✒सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी✒
सिंधुदुर्ग:- विश्व समता कलामंच लावले ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व आंबेडकरी चळवळीतील कवी – गायक जनीकुमार कांबळे यांना नुकताच राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कबनुरकर हॉल साखरपा येथे दि. ३० जानेवारी, २०२२ रोजी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध कवी आणि गायक जनीकुमार कांबळे यांना कोकणचे गाडगे बाबा मारुती काका जोयशी व मनोज जाधव यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संगमेश्वर सभापती जयसिंग माने, मारुती काका जोयशी, युयुस्तु आर्ते (सावर्डे, चिपळून), कोमल रहाटे (चंद्रपूर), श्री. खोब्रागडे (नागपूर), राहुल सावंत (मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी, गायक जनीकुमार कांबळे यांची स्वरचित सामाजिक, धार्मिक व राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारी लोकगीते असणारी आतापर्यंत एकूण ७ पुस्तके प्रकाशित झालेली असून सध्या “बसलाय दिल्लीच्या गादीवर…” नावाची त्यांची स्वरचित ऑडिओ गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये आलेली आहे. यामध्ये वारगाव गावचे कविवर्य नाथा जाधव व शिरगावचे कविवर्य भरत नाईक यांच्या गाण्याचा समावेश केलेला आहे. कवी, साहित्यिक जनीकुमार कांबळे यांच्या स्वरचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोवाड्यावर देखील या कार्यक्रमात विशेष चर्चा निवेदन केले गेले.
कवी, गायक जनीकुमार कांबळे यांच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शिक्षक राजेश कदम यांना देखील उत्कृष्ट निवेदक व सूत्रसंचालक म्हणून तर शिरगाव ता. देवगड येथील प्रसिद्ध जादुगार आणि कवी भरत नाईक (शिरगावकर) यांना देखील त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, यवतमाळ, पुणे, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, आजरा, सांगली येथून कलाकार व कार्यकर्ते उपस्थित होते.