निसर्ग व पर्यावरण पूरक होळी साजरी करावी

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.९९२१६९०७७९

नागपूर: देशात होळी हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने सर्वत्र साजरा करण्यात येतो.यामुळे आपल्याला सर्वत्र होळी मिलन दिसून येते.महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी होळीचे आगळीवेगळे महत्त्व आहे.होळी म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा सण. ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे होळीचा फाल्गुन महिना मराठी माणसासाठी शेवटचा महिना आहे. नवीन वर्षांची सुरुवात चैत्र महिन्यापासुन होते म्हणजेच “गुडी पाडवा”. त्यामुळे जुने वर्ष होळी व धुलीवंदनाच्या रूपात साजरे करून जुन्या वर्षाला निरोप दिला जातो आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.बदलत्या काळानुसार होळी व धुलीवंदन साजरे करतांना पर्यावरण व निसर्गाचे संतुलन जोपासने अत्यंत गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने कोणत्याही धर्माचे सण असो त्यांनी सुध्दा निसर्गाला कुठेही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.सध्याच्या परिस्थितीत वाढते प्रदूषण सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे.त्यामुळे होळी हा सण साजरा करतांना पर्यावरणाशी निगडित असावा जेणेकरून निसर्गाला इजा पोहोचणार नाही.कारण होळी या सणाला लाकुड,पाणी यांचा वापर जास्त होतो आणि या दोन्ही गोष्टी पर्यावरणाशी अत्यंत निगडित आहे.

होळीला दरवर्षी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे होळी या सणाला पाण्याचा वापर टाळावा व पर्यावरणातील वाढते प्रदूषण पहाता स्वच्छतेकडे सर्वांनीच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे.देशात आणि जगात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढणार सुध्दा आहे.त्यामुळे होळीच्या सणाला पाण्याचा वापर टाळावा व पाणी वाचवीण्याचा संकल्प सर्वांनीच करावा.उष्णतेचे वादळ आणि पाण्याच्या हा!हा!कार यामुळे मानव व पशुपक्षी नेहमीच भरडत असतो.वाढती लोकसंख्या यामुळे मानवाने भुभाग पुर्णतः काबीज केल्याचे दिसून येते.देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.होळीच्या दीवशी गुलाल, रंग,वारीस इत्यादीसह केमिकल युक्त रंगाचा वापर होतांना आपण पहात असतो.यामुळे डोळ्यांना व चेहऱ्याला इजा होऊ शकते यापासून सावध राहण्याची गरज आहे.रंग खेळताना कोणीही हा विचार करत नाही की पाण्याचा व्यत्यय कीती होतो.होळी या सनाला दरवर्षी “लाखो लिटर”पाणी वाया जात असते आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.आजही महाराष्ट्रात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतांना दीसते व याचा परिणाम शेतकऱ्यांना जास्त भोगावा लागतो.आजच्या परीस्थितीत हवामान खाते सांगत आहे की यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त तापणार आहे.

यावरून आपण समजू शकतो की पाण्याची समस्या कमी न होता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.त्यामुळे आज पाण्याचा “एक एक थेंब” वाचवीण्याकरीता मानवाने चुरशीचे प्रयत्न केले पाहिजे.होळीचा सन हा पाच दिवस म्हणजेच पंचमी पर्यंत चालतो त्यामुळे या काळात पाण्याचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्याचप्रमाणे देशात जंगल तोडीमुळे लाकडांची कमतरता पहाता होळी दहणाकरीता कमीत कमी लाकडांचा उपयोग केला पाहिजे किंवा होळी दहनाकरीता गोअरीचा(काउडंग) वापर जास्त करावा यामुळे पर्यावरणात सुगंध निर्माण होईल.देशात आणि जगात पाण्याची समस्या  पहाता फक्त देशी गुलाल किंवा फुलांचा वापर करून होळी या महत्त्वपूर्ण सनाचा आनंद घ्यावा.आज पाण्याच्या भरोशावरच मनुष्य,प्राणी,अन्न-धान्य, जंगल हे सर्व पाण्यावरच अवलंबून असते.पाणी हे “सोन”समजा आणि होळीला फक्त “गुलाल” किंवा फुलांचा वापर करून होळीचा सण साजरा करावा.ज्या प्रमाणे मानवाला “अन्न,वस्त्र, निवारा”या गोष्टीची गरज आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण जिवसृष्टीला व पृथ्वीला “पाण्याची” नितांत गरज आहे.जंगल तोडीमुळे निसर्गाचे संतुलन “विस्कळीत” झाले आहे.त्यामुळे आज हिंसक पशु (वाघ, बिबट्या,अस्वल) इत्यादी अनेक प्राणी जंगलातून गावात व शहरात शीरकाव करतांना दिसते.कारण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल संपदेवर अतीक्रमन केल्याचे दिसून येते.त्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत नसुन आपण जंगलाकडे आगेकूच(अतिक्रमण) करीत आहो.त्यामुळे होळी करीता कमीत कमी लाकडांचा वापर केला पाहिजे.त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने अवैध वृक्षतोड होण्याची शक्यता असते ती ताबडतोब थांबवली पाहिजे.आता वाढत्या कारखान्यांमुळे आणि परमाणु परीक्षण,शस्त्रस्पर्धा आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे होळीला पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.भारतासह संपूर्ण जगभर २२ मार्चला “जागतीक जल दीन”पाळला जातो याची कृती होळीच्या सणाला करावी व पाणी वाचवावे.कारण पाणी हे निसर्गाचे “अनमोल रत्न”आहे.त्याला वाचवीण्याचा प्रयत्न सर्वांनीच सर्व स्तरातून केला पाहिजे.इतर देशांप्रमाणे भारतसुध्दा पाण्याच्या बाबतीत “रेडलाईट झोनमध्ये”आहे.त्यामुळे भारतसुध्दा पाणी टंचाईच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.त्यामुळे होळीचे औचित्य साधून प्रत्येकांनी आपल्या परीसरात एक-एक झाड लावुन निसर्गाला पुनरूज्जीवीत केले पाहिजे व सर्वांनीच पाणी  वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे.यातच खऱ्याअर्थाने धुलीवंदन दीसुन येईल.त्यामुळे “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारून पुढचे पाऊल टाकायला पाहिजे.

गेल्या दोन वर्षांत करोना महामारीने मानवजातीला बरेच काही शिकवीले.त्याचे अनुकरण करून प्रत्येकांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. होळी उत्सवात उन्माद नको! हुल्लडबाजी नको परंतु आनंद भरपूर घ्यावा. यामुळे सर्वांचेच जीवन सुरक्षित रहाण्यास मोठी मदत मिळेल.कारण आपण सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित, निसर्ग सुरक्षित तर संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षित, संपूर्ण जीव सृष्टी सुरक्षित तर जग सुरक्षित.यासाठी होळीच्या महत्वपूर्ण सणाचे औचित्य साधून प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावलेच पाहिजे.यामुळे एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल व पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल आणि होळी या सणाचे महत्त्व संपूर्ण जगात निसर्ग वाचविण्याच्या दृष्टीकोनातून चांगला संदेश जगभर पसरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here