भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार. रय्यतवारी येथे ४०० कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो. 8830857351
चंद्रपूर, १ मार्च: भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कधीही पातळी सोडली नाही. भाजपाने समाजकारणाची नेहमीच कास धरत कायम सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी आणि आनंद पेरण्याचे काम केलं आहे . त्यामुळेच भाजप सर्वांच्या पसंतीचा पक्ष असल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
२४ फेब्रुवारी रोजी रय्यतवारी येथे भाजपामध्ये ४०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते, पक्षावर विश्वास ठेऊन प्रवेश करणाऱ्यांची कधीही निराशा होणार नाही. पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चपळतेला चित्त्याची उपमा देत मुनगंटीवार यांनी वेगाने पक्षहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. चंद्रपूर जिल्हा छोटा भारत आहे, कारण येथे देशातील बहुतांश भाषा बोलणारे लोक राहतात. रय्यतवारीसह चंद्रपुरात हा सलोखा वाढत जावा असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले. देशाचा विकास साधायचा असेल तर भाजप आणि विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.
ज्या ज्या व्यक्तीने भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे, त्या त्या व्यक्तीने सामाजिक विकास होताना बघीतला आहे. भाजप म्हणजे प्रगती, विकास, उन्नती आणि सकारात्मक शक्ती असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी प्रवीण गुरमवार यांच्या नावाची भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरमवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
•डब्ल्यूसीएलच्या जमिनीचा तिढा सोडविणार
वेकोलिने अनेक नागरिकांना जमिन रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील मुनगंटीवार यांनी दिली.
•समाजाला जातीयवादातून मुक्त करा
समाजात जातीय विष पसरविण्याचे काम केले जात आहे. संतांनाही जातीमध्ये विभागण्याचे काम करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांनी हा प्रकार चालविला आहे. त्यामुळे जातीयवादापासून समाजाला मुक्त करण्याची वेळ आली आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून हे साध्य होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद कडु, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगर महामंत्री बिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी आदी उपस्थित होते.