“केंद्र सरकार अदानी, अंबानीच्या हिताचे“: बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांसाठी एल्गार; कार्यकर्त्यांसह दुचाकीने दिल्लीला रवाना
अमरावती:– रंगा बिल्लाच्या जोडीने केवळ अदानी,अंबानी या वर्गाचे भले केले आहे या केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही, जबरदस्तीने शेतकऱ्यांवर काळा कृषी कायदा लादून मानहानी कारभार या सरकारचे सुरु आहे त्यामुळे सरकारने आणलेल्या या कृषी कायद्याविरोधात सर्वांनी एकजुटीने दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला समर्थन देणे आवश्यक आहे असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंताच्या समाधी स्थळावरून व्यक्त केले..
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या महा समाधी स्थळावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढून दिल्ली येथे तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनात एल्गार पुकारला असून बच्चू कडू व हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला रवाना झाले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दहा दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याने कुठल्याही शेतकऱ्यांचे समर्थन नसल्याने आज संपूर्ण भारतभर विविध पक्ष व संघटनेने आंदोलन पुकारले आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवस आधी केंद्र सरकारला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू असादेखील इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला होता.
आज प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याच्या कान्याकोपऱ्यातुन राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी प्रहार’चे हजारो कार्यकर्ते दुचाकी व टॅक्टरने दाखल झाले होते तेव्हा बच्चू कडू यांनी काही वेळ उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सूचनासह मार्गदर्शन केले तेव्हा बोलत असताना राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी बच्चू कडू यांनी राष्ट्रसंताच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले तर समाधी स्थळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रसंतच्या समाधी स्थळावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, दीड तास रोखून ठेवला होता तर मोर्चास्थळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये 8पोलीस अधिकारी, 80कर्मचारी, एक आरसिपी पोलीस तुकडी तैनात होती.
राज्य मंत्री बच्चू कडू यांचा दुचाकी मोर्चा गुरुकुंज मोझरी येथून डावरगाव मार्गे जाणार आहे तर बेलोरा चांदुरबाजार येथे मुक्काम व तेथून उद्या सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बैतुल मार्गे मध्यप्रदेशला रवाना होणार आहे.