घोड्यावरून उतरा

58

लोकशाहीत Elections are great leveller असे म्हटले जाते. म्हणजे निवडणुका सर्वाना जमिनीवर आणतात. गेली साठहून अधिक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला २०१४ च्या निवडणुकीत याची जाणीव झाली. आपला सत्तासूर्य कधीच मावळणार नाही, अशा भ्रमात असलेला हा पक्ष बघता बघता पाचोळ्यासारखा उडून गेला आणि इतिहासातील नीचांकी संख्येसह त्या पक्षास लोकसभेत जावे लागले. ही निवडणुकांची ताकद. सत्ता, तिच्या सहकार्याने दामटता येणारे अन्य उद्योग आणि त्यांच्या जोडीला एका समाजास सतत उपकृत करायची कायमची संधी हे या कायमस्वरूपी काँग्रेसी सत्ताधाऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण बनले होते. २०१४ चा झंझावात आला आणि या मंडळींचा माज मतपेटय़ांतून वाहून गेला. या निवडणुकांत भाजपला एकहाती बहुमत मिळाले. त्या पक्षाने २८२ जागा पदरात पाडून घेत जणू विक्रमच केला. गेल्या कित्येक दशकांत कोणत्याही पक्षास स्वबळावर सत्ता स्थापण्याची न मिळालेली संधी भाजपला मिळाली. त्यानंतर या पक्षाचे वारू देशभर चौखूर उधळले. परंतु त्यानंतर लगेच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत नवख्या आम आदमी पक्षाने पंतप्रधानांच्या नाकाखाली भाजपचा धुव्वा उडवला. त्यानंतरच्या बिहार विधानसभेतही भाजपचे काही चालले नाही. पुढे विजयी ठरलेल्या नितीशकुमार यांनाच गिळंकृत करून भाजपने मतपेटीतून जे जमले नाही ते मागच्या दाराने करून दाखवले, हा मुद्दा वेगळा. परंतु मतदार भाजपच्या मागे वाहत गेले नाहीत, हे नक्की. तात्पर्य राजकीय पक्षांना निवडणुका त्यांची जागा दाखवून देतात. भाजपला पुन्हा एकदा याची जाणीव होत असेल.