मुंबई मानखुर्दमध्ये भीषण आग, 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली.

50

मुंबई मानखुर्दमध्ये भीषण आग, 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली.

चार एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभी, रसायनांमुळे मोठा वणवा; ‘स्क्रॅप’ गोदामे जळून खाक

राज शिर्के प्रतीनिधी

मुंबई:- मानखुर्द मंडाला परिसरातील ‘स्क्रॅप’ गोदामाला शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोदामे जळून खाक झाली. या आगीत गोदामातील रसायन, तेलाने भरलेले सुमारे 500 ते 600 डब्बे फुटल्याने आगडोंबच उसळला. आगीचे लोळ आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

मानखुर्द पूर्वेला मंडाला भागात कुर्ला स्क्रॅप परिसर आहे. याच परिसरातील सुमारे चार एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभी राहिली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपासून काही अंतरावर असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दी, प्लास्टिक असे अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे येथे सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत असतात. शुक्रवारी दुपारी एका भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामात रसायन, तेलाने भरलेले डबे होते. यातील 500 ते 600 डब्बे आगीनंतर फुटल्याने क्षणात ही आग पाच ते सात हजार चौरस फुटावर पसरली आणि आजूबाजूच्या गोदामात पसरून भडका उडाला.

या परिसरात दाटीवाटीने गोदामे असल्याने आग वेगाने पसरत गेली. यात गोदामे 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर येथील झोपडपट्टीतील, आजूबाजूच्या वसाहतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. दीड – दोन वर्षापूर्वी आणि त्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात येथील ‘स्क्रॅप’ झोपडपट्टीला भीषण आग लागली होती.

येथे आग लागते तेव्हा प्रशासन खड़बडून जाग आल्याप्रमाणे कारवाई करते. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने येथे पुन्हा गोदामे उभी राहतात. येथे अनेक वर्षापासून अनधिकृतपणे गोदामे उभी राहत आहेत. माफियांची दहशत असल्याने त्यांना विरोध करण्यास कोणी धजावत नसल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी सांगितले.

आगी विझवण्याच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी ‘बेस्ट’ने येथील वाहतूक दुसर्‍या मार्गावर वळवली. शिवाजी नगर, छेडानगर, मानखुर्द, नवी मुंबईत जाणार्‍या बसेस अमर महाल, चेंबूर नाका, व्ही. एन. पुरव मार्ग ते महाराष्ट्र नगर या मार्गाने वळवण्यात आल्या. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आवश्यकता भासल्यास अग्निशमन दलाने ‘बीपीसील’, ‘एचपीसीएल’च्या अग्निशमन यंत्रणेलाही मदतीसाठी सज्ज राहण्यास सांगितले. ऑईल, केमिकल मोठ्या प्रमाणात असल्याने आग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘एचपीसील’, ‘बीपीसीएल’ची फोन यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली.