सत्तेचा माज,बेरोजगारांचे हाल आरडीसीसी बँक नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती

सत्तेचा माज,बेरोजगारांचे हाल
आरडीसीसी बँक नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती
रोजगारनिर्मिती थांबविल्याने तरुणांमध्ये संताप

सत्तेचा माज,बेरोजगारांचे हाल आरडीसीसी बँक नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती
| रत्नाकर पाटील|
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशातील बेरोजगारीची स्थिती भीषण आहे. शिक्षण घेतले पण नोकरी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोलमजूरी करुन, प्रसंगी पोटाला चिमटा काढून पालकांनी शिक्षण दिले, आणि सरकारने रोजगाराचे केवळ आश्वासन. आज ग्रामीण भागातील तरुण नोकरीसाठी वणवण करीत आहे. याच बेरोजगारीच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत शेतकरी कामगार पक्षाने हजारो तरुणांच्या हाताला काम दिले, संसार उभा केला. कोणतंही राजकारण न करता केवळ समाजहितासाठी, तरुणांच्या उज्वल भवितव्यासाठी शेकाप काम करीत आहे. मात्र केवळ विरोधी भावना ठेऊन शिंदे सरकारने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती प्रक्रियेला विरोध केला. सत्तेच्या जोरावर नोकरभरतीला स्थगिती दिली. विधानसभा निवडणूकीचे कारण सांगून तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये सरकारविरोधात नाराजी पसरली असून तात्काळ ही स्थगिती हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील तरुणांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
केंद्रातील मोदी सरकार असेल किंवा राज्यातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील तीन पक्षांचे सरकार…सामान्यांच्या प्रश्नांबद्दलची या सरकारची बेफिकिरी लपून राहिलेली नाही. या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी रोजगार निर्माण करण्याची केलेली घोषणा कधी विरुन गेली, हे त्यांच्या भक्तांनाही सांगता येणार नाही.
रायगड जिल्ह्यातील तरुण हा तंत्रज्ञानामध्ये प्रवीण असा आत्ममग्न, कुशल आहे. ज्याला पुरेशा शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नाहीत. आजचे तरुण हे उद्याचे शिल्पकार आहेत, ही भावना ठेऊन आज शेकापक्ष रोजगार निर्मितीसाठी अहोरात्र काम करीत आहे.
आधी कोरोना मग मराठा आरक्षणाचा प्रश्न, लोकसभा-विधानसभा निवडणूका, सरकारची अनिश्चितता, योजनांची खैरात, नैसर्गित आपत्ती असा प्रवास करीत उमेद बाळगलेले युवक मनस्तापातून स्वतःलाच दोष देत नोकरीच्या प्रतिक्षेत होते. गरीब आई-बाबांना सोडून शहरात राहणं जमणार नाही. म्हणून आपल्याच जिल्ह्यात कुठेतरी रिक्तपदे भरली जातील आणि आपली गाडी रुळावर येईल, या आत्मविश्वासाने ओतप्रोत बेरोजगार आता नोकरभरती प्रक्रियेला मिळालेल्या स्थगितीच्या महाजालात अडकला आहे. सरकारने गेल्या पाच वर्षात रोजगार देण्याची लालच दाखवली मात्र प्रत्यक्षात फसवणूकच पदरात पडली.
सत्तेचा माज दाखवण्याऐवजी विकासाचे राजकारण, तरुणांचे हित, महिलांची सुरक्षितता, आरोग्य सुधारणे आवश्यक आहेे. मात्र याकडे सत्ताधारी डोळेझाक करीत आहे. रोजगारावर बोलायचं नाही तर बेरोजगारांना दरमहा त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यावर बोलणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम तरुण करतील, असा सज्जड दम तरुणांनी दिला आहे.
आजपर्यंत आरडीसीसी बँकेत नियमांनूसार आणि कोणताही आर्थिक हितसंबंध न जोपासता नोकरभरती करण्यात आली आहे. बँकेची भरतीची जाहिरात येताच हजारो तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले. नोकरी मिळेल अशी आशा तरुणांना होती. मात्र शिंदे सरकारने यात अडवणूक केल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यापुर्वीच त्यावर विरजण पडले.
—–
मतांसाठी बेरोजगारीचे राजकारण नको
केवळ मतांसाठी राजकारण करणे ही शेकापची संस्कृती नाही. गेली 5 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या महायुतीला रोजगार निर्मितीची अमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये जर शेकाप कायद्याच्या चौकटीत रोजगार उपलब्ध करुन देत असेल तर शिंदे सरकारने त्यात अडथळा आणणे ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली आहे.

विकासाचे राजकारण हवे
विविध योजनांची खैरात आणि विकासकामांचे आमिष दाखवून सत्तेत विराजमान झालेल्या सरकारला गेल्या पाच वर्षात रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत. या सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. या अपयशी सरकारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिंदे सरकारच्या आमदारांनी विकासाचे राजकारण करण्याचे धाडस दाखविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तरुणांच्या तोंडाशी असलेला रोजगाराचा घास हिरावून घेतला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराचे साधन खुले करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना रोजगार मिळवून देण्यामध्ये शेकापचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिल्हा बॅकेच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केल्यास कदापि सहन करणार नाही. शेकाप कायमच युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. बँकेची भरती स्थगित करीत बेरोजगांरांच्या घशातील घास काढण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. घाणेरड्या पध्दतीने होत असलेल्या या राजकारणाचा तीव्र निषेध आहे.
चित्रलेखा पाटील- शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

आगामी निवडणूकीत सरकाला बसणार फटका?
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो तरुणांनी ऑनलाईन अर्ज भरून या प्रक्रीयेत सहभाग घेतला. मात्र आगामी निवडणूकीचे कारण दाखवून ही भरती प्रक्रीया रद्द केल्याने तरुणांची फार मोठी निराशा झाली आहे. एका बाजूला रोजगार देणार असे सांगून आश्वासनाची बोळवण सरकार करीत असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारांना रोजगारापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. सरकारच्या या दुटप्पी भुमिकेबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली असून आगामी निवडणूकीत शिंदे सरकारला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
–—
राजकीय आकसापोटी बेरोजगारांचा बळी
जिल्ह्यात अनेक तरुण उच्चशिक्षित असून त्यांना नोकरीची गरज आहे. शासनाच्या अधिकृत एजन्सीद्वारे ऑनलाईन पध्दतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती होणार होती. या भरतीवर हरकत घेण्याचे काही कारण नव्हते. परंतु राजकीय आकसापोटी विरोधी भावनेतूनच चुकीची माहिती देऊन शासनाला स्थगितीचे आदेश काढण्यास भाग पाडले आहे. राजकीय आकसापोटी बेरोजगारांचा बळी जात आहे. तरुणांना नोकरी मिळण्याची आशा होती. ती संपुष्टात आली आहे. शासनाने याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. निवडणूकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. तरीदेखील ते कारण दाखवून भरतीला स्थगिती देणे चुकीचे आहे, असे मत शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी तीव्र शब्दात व्यक्त केले.
–—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here