बर्ड फ्लू म्हणजे काय? चिकन-अंडी खाणं आता थांबवायचं का?
महाराष्ट्र:- कोरोनाची चिंता करण्यात 2020 चं अख्खं वर्षं गेलं. आणि त्यावरची लस येतेय असा दिलासा मिळत असतानाच बातम्या यायला लागल्या बर्ड फ्लूच्या. किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?
मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळलं. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बर्ड फ्लू हे यामागचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्येही बर्ड फ्लूच्या संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याचं तपासात आढळलंय.
मरण पावलेल्या या पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे जेणेकरून तो संसर्ग माणसांमध्ये पोहोचू नये.
केरळच्या कोट्टयम आणि अलापुळामधल्या ज्या भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलाय तिथली बदकं, कोंबड्या आणि घरातले इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आलेयत. ज्या शेतकऱ्यांकडचे पक्षी मारले जातील, त्यांना केरळ सरकार मदत देणार आहे. मध्य प्रदेशातही पक्ष्यांना जमिनीत पुरून मारण्यात येतंय.
महाराष्ट्रामध्ये असे बर्ड फ्लूमुळे मेलेले पक्षी आढळलेले नाहीत, पण खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने अॅलर्ट दिलाय.
याबाबत बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, “सद्यस्थितीत राज्यात बर्ड फ्लू संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. राज्यभरात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अलर्ट आहे. एकही पक्षी मृतावस्थेत आढळला तर तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
राज्याच्या पशु, दुग्धविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी म्हटलंय, “स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात अशा जागांवर सरकारचं लक्ष आहे. सोलापूरला उजनी जलाशयाच्या भागावर आम्ही सतत मॉनिटरिंग करतोय. त्यातसोबत नाशिक, नागपूरच्या भागातही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
राज्य सरकारने जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं
♥ सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
♥ पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
♥ संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
♥ बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
♥ जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
♥ पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
बर्ड फ्लू काय आहे?
‘बर्ड फ्लू’ हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.
चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का?
नाही. तसं करायची गरज नाही. चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं WHO ने म्हटलंय.
मांस शिजवताना ते उकळून शिजवावं, कच्चं वा आतून लाल राहू नयेत, अंडी पूर्णपणे उकडावीत असं WHOने म्हटलंय.
बर्ड फ्लूची माणसांतली लक्षणं काय?
भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम – ARDS होण्याची शक्यता असते. ताप – सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.
बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे?
तुम्ही कोंबड्या – बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा.
कोरोना काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात. वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, बाहेरचे हात चेहऱ्याला – नाका-तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं, तर यंत्रणेशी संपर्क साधा.