अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी

159

मिडीया वार्ता न्यूज
नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात उद्यापासून (९ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते. तर, सुनावणी घाईत न घेता ती जुलै २०१९च्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी मुस्लिम पक्षकारांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे ५ डिसेंबरला केली होती.

हे प्रकरण म्हणजे एखादया सर्वसाधारण जमिनीचा वाद नाही, तर या प्रकरणाचा परिणाम भारतीय राजकारणाच्या भविष्यावर पडणार आहे असे सिब्बल यांनी आपला मुद्दा पटवून देताना सांगितले होते. हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावे अशी मागणीही त्यांनी केली होती. सिब्बल यांच्या या मागणीनंतर कोर्टाबाहेर जोरदार चर्चा रंगली होती. राम जन्मभूमी ट्रस्ट, रामलल्ला आणि इतर संघटनांकडून हरीश साळवे आणि सीएस वैद्यनाथन यांनी बाजू लढवली.

हे प्रकरण गेली ७ वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर काय निकाल येईल हे कुणालाही माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी झालीच पाहिजे. बाहेर काय स्थिती आहे याबाबत कोर्टाने विचार करू नये असे मुद्दे साळवे यांनी मांडले होते.

उत्तर प्रदेश सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सुनावणी लवकरात लवकर घेण्याची कोर्टाला विनंती केली होती. यानंतर इंग्रजी भाषेत असलेल्या दस्तावेजांचे भाषांतर करण्यात यावे अशी मागणी सिब्बल, राजीव धवन आणि अनूप चौधरी यांनी कोर्टाकडे केली होती. यावर कोर्टाने भाषांतरासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.