छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 20 मुलाखात घेण्यात आलेल्या 241 विद्यार्थ्यांना सरसकट देण्यात यावी.
✒प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी✒
नागपुर:- सारथी संस्थेमार्फत 2018 पासून पी.एच.डी (Ph. D) आणि एम.फील (M. phil) करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून अधिछात्रवृत्ती देण्यात येते. सारथीने 1 जून 2018 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर 2019 मध्ये 502 जागांसाठी जाहिरात काढली व 30 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज मागवण्यात आले. तत्पूर्वी 16 फेब्रु. 2019 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत 502 उमेदवारांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी मान्यताही देण्यात आली. सारथी कडून तब्बल 1 वर्ष लोटल्यावर 23 डिसेंबर 2020 रोजी 342 उमेदवारांची तात्पुरती यादी (Provisional list) प्रसिद्ध करण्यात आली. कागदपत्रांच्या आधारावर मुलाखतीसाठी 241 पात्र उमेदवारांची यादी 3 महिन्यानंतर प्रसिध्द करण्यात आली. व मुलाखती प्रत्यक्ष उपस्थितीत दिनांक 23 ते 27 मार्च 2021 या कालावधीत सारथी कार्यालय, पुणे येथे घेण्यात आल्या. मुलाखतीच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सारथीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की 502 जागांमध्ये कपात करून फक्त 100 उमेदवारांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार असे सांगितले गेले. सदर जागा कपातीच्या निर्णयाचा फटका उर्वरित संशोधक विद्यार्थ्यांना बसणार आहे. अर्ज मागविल्याच्या तब्बल दीड वर्ष उलटूनही अत्यंत संथगती ने CSMNRF-20 प्रक्रिया सुरू असून अद्याप संशोधक विद्यार्थ्यांना अवार्ड लेटर बहाल करण्यात आले नाही.
इतर संशोधन अधिछात्रवृत्ती प्रदान करणाऱ्या संस्था सरसकट व जास्तीत जास्त विद्यार्थी ज्या निकषांवर पात्र ठरतील अशा प्रकारे अधिछात्रवृत्ती प्रदान करत असताना सारथी केवळ 100 संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा विचार करत आहे, हे खूपच खेदजनक आहे. सारथी संस्था ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (BARTI) धर्तीवर स्थापन करण्यात आली आहे, ती संस्था विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश दिनांकापासून अधिछात्रवृत्ती प्रदान करत आहे, तसेच राजीव गांधी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (RJNF) ही संस्था देखील विद्यार्थांना महाविद्यालय प्रवेश दिनांकापासून अधिछात्रवृत्ती प्रदान करत आहे.
तरी सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती-20 साठी मुलाखत घेण्यात आलेल्या सर्व 241 विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती बहाल करण्यात यावी तसेच प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईमुळे इतर अधिछात्रवृत्ती देणाऱ्या संस्था BARTI, RJNF, NFOBC, NFST, NFSC प्रमाणे महाविद्यालयीन प्रवेश दिनांकापासून अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी अधिछात्रवृत्तीचा विध्यार्थी करत आहे.