आर्णी पोलिसांनी पकडला काळ्या बाजारात जाणार्या 25 टन तांदळाने भरलेला बाराचाकी ट्रक.
आर्णी:- चंद्रपूरला काळ्या बाजारात जाणार्या तांदळाने भरलेला बाराचाकी ट्रक आर्णी पोलिसांनी 5 फेब्रुवारीला रात्री 1 च्या सुमारास पकडला आहे. आर्णी पोलिस ठाणेदार पितांबर जाधव हे आपल्या सहकारार्यांसह गस्त घालत असताना कोपरा फाट्याजवळ बाराचाकी ट्रक अवैधरित्या तांदळाची वाहतूक करीत असताना आढळला. हा ट्रक आर्णी पोलिसांनी जप्त केला असून ट्रकमधील माल किती आहे, याची पाहणी शहरातील बालाजी जिनिंगमध्ये करण्यात आली. यावेळी आर्णी तहसीलचे तहसीलदार परसराम भोसले, आर्णीचे पोलिस ठाणेदार पितांबर जाधव, सतीश चौधर, मनोज चव्हाण, तुषार जाधव, अक्षय ठाकरे उपस्थित होते. हा ट्रक क्रमांक एमएच 29 टी 2277 मध्ये एकूण 425 कट्ट्यांमध्ये 24.290 टन तांदूळ असून एवढा तांदूळ साठा नेमका कुठला आहे, शासकीय आहे की आणखी कुणाच्या मालकीचा, हे अद्याप समजू शकले नाही. तांदळाच्या कट्ट्यांची तपासणी करीत असताना शासनाच्या कट्ट्यावर असलेले शिक्क्याचे कट्टेही आढळून आल्याने हा माल रास्त धान्य दुकानातील असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. हा माल कोणत्यातालुक्यातील आहे व हा माल चंद्रपूरला कोण पाठवत होता, त्याच्या तळापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. या मालाची तपासणी व्हिडिओ कॅमेर्याच्या निगराणीत करण्यात आली. आर्णी पोलिसांनी ट्रकचालक रवींद्र अजाब देवतळेच्या (लहुजीनगर, पडोली, चंद्रपूर) विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले पुढील तपास करीत आहेत