‘तू जर मला विसरण्याचा प्रयत्न केलास ना…’ प्रपोज डेच्या दिवशी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेवून आत्महत्या.
आत्महत्या केलेल्या 15 वर्षीय मुलीचं नाव सीमा संतोष वानखेडे असून ती मालदाभाडी येथील न्यु इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेते. तिचे वडिल कामानिमित्त कोल्हापूरला वास्तव्यास असतात, तर आई गावीच शेतमजूरीचं काम करते. सीमाने सोमवारी दुपारी एका मुलाच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा घरी आली की नाही? हे पाहण्यासाठी सीमाची आजी बिंदाबाई उखा खरात घरी आल्या होत्या. त्यांनी यावेळी पाहिलं की, घराचा दरवाजा फक्त लोटला होता. आजीने दार उघडून आतमध्ये पाहिलं तर सीमाचा मृतदेह घराच्या छताला लटकताना दिसला. हे दृश्य पाहून आजी बिंदाबाईने आरडाओरडा केला. त्यानंतर गावकरी मदतीला धावून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
याप्रकरणी तपास करताना पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यातमध्ये ‘आय लव्ह यू ऋषीकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. ए ऋषी तू जर मला विसरण्याचा प्रयत्न केलास ना तर …’ अशा मजकूर लिहिला आहे. चिठ्ठीत उल्लेख केलेला ऋषिकेश नेमका कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी सीमाचे मामा रुपेश वसंत खरात यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अक्षय चोपडे आणि त्याचा मित्र ऋषिकेश विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दोघंही नवी दाभाडी येथील रहिवासी आहेत. अक्षय चोपडे नावाचा हा युवक सोमवारी सीमाच्या घराबाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.