शेळ्यांच्या कळपावर वाघाचा हल्ला
वाघाच्या सतत हल्याने तोहोगाव परिसरात दहशत
वाघाची दहशत बघता रात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-तोहोगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या आर्वी येथील शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करून सात बकऱ्या ठार केल्या तर अनेक बकऱ्यांना जखमी केल्याची घटना आज दि. ९ एप्रिलच्या पहाटे ४ वाजताच्या दरम्यान घडली. यामुळे तोहोगाव व आर्वी शिवारावर दहशत पसरली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे १ एप्रिलला गोशाळेवर वाघाने हल्ला करून सहा जनावरांना ठार केले तर ५० ते ६० जनावरे गोशाळा सोडून जंगलात पळून गेले. ३ एप्रिलला गावाशेजारी माता मंदिरा जवळील बाळू मोरे यांच्या गोठ्यावर मध्यरात्री हल्ला करन बैलाला ठार केले तर दुसऱ्यास जखमी केले. रात्रभर वाघ गोठ्याजवळ ठाण मांडून बसला व दुसऱ्या दिवशी ४ एप्रिलला शेतात चरणाऱ्या दोन जनावरांवर हल्ला करन जखमी केले. सतत वाघाच्या हल्ल्याने व परिसरात पसरलेल्या दहशतीने नागरिक भयभीत झाले असुन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने गावकरी तीव्र संताप व्यक्त करीत वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण, गोंडपिपरीचे ठाणेदार राजगुरू, सहायक वनसंरक्षक पवार, धाबा वनाधिकारी बोबडे, पोलीस व वन कर्मचाऱ्यांच्या पथक हजर होऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
वाघालाजेरबंद करण्याची मागणी आ. सुभाष धोटे, फिरोज पठाण, प्रवीण मोरे, ग्राप उपसरपंच शुभांगी मोरे, ग्रापं सदस्य उज्वला ठेंगणे, वनिता रागीट, पौर्णिमा भोयर, नीलकंठ रागीट, बाबुराव झाडे, संतोष साळवे, सुनील वाघाडे, महेंद्र दुर्गे, मंगेश शेरकी, संजय बोपणवार, संजय सातपुते, बाळा शेंडे, छाया मोरे व सुनंदा महाजन यांनी केली. आ.धोटे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच या भागातील रात्रीचे भारनियमन न करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेत शिवारात फिरणाऱ्या वाघामुळे पाळीव प्राण्यास तसेच मानवाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फिरोज पठाण यांनी दिला आहे.