मुंबई:किसान सभेतर्फे विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला आहे. याआधी शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला होता.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला आहे. लाखोंचा सहभाग असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून गेल्या मंगळवारी निघाला. तो मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. हा मोर्चा १२ मार्च रोजी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. शेतकरी विधानभवनाला घेराव घालतील. शेतकऱ्यांच्या मोर्चाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं याआधी पाठिंबा जाहीर केला होता. आता मनसेनंही पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा असल्याचं फोनवरून सांगितलं आहे, अशी माहिती किसान सभेचे सचिव अजित नवले यांनी दिली. मनसेचे कार्यकर्ते उद्या ठाणे आणि मुंबईत मोर्चातील शेतकऱ्यांचे जंगी स्वागत करतील. तसेच उद्या, रविवारी सकाळी ८ वाजता खारेगाव टोलनाका येथे ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाणे आणि मुंबईकरांनीही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे, असं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here