ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वीज निर्मितीत ऐतिहासिक वाढ महानिर्मितीची विक्रमी 10,445 मेगावॅट वीज निर्मिती.
महानिर्मितीच्या इतिहासात 60 वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती.
✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मुंबई :- ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील औष्णिक केंद्रांची निर्मिती क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे परिणाम आता दिसू लागले असून देशातील एक अग्रगण्य वीजनिर्मिती कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या महानिर्मितीने आज 9 मार्च रोजी दुपारी 4.40 वाजता एकूण 10,445 मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.
वीज निर्मितीमध्ये कोळसा व्यवस्थापन सर्वात महत्वाचे असते. डॉ. राऊत यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील औष्णिक वीज केंद्राची उत्पादन क्षमता भारांक अर्थात प्लांट लोड फॅक्टर वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. राज्य वीज नियामक आयोगाने वीज केंद्रांची उत्पादन क्षमता किमान 85 टक्के असायला हवे असे बंधन घातले आहे. डॉ. राऊत यांनी ही क्षमता किमान 90 टक्के गाठण्याचे लक्ष्य ठरवले. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण कोळसा न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन त्यांनी कमी गुणवत्तेच्या कोळशामुळे वीज निर्मिती क्षमतेतील घट थांबविण्याचा प्रयत्न केला.
डॉ. राऊत यांनी 6 जानेवारी 2020 रोजी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यादिवशी महानिर्मितीचे एकूण वीज उत्पादन 6 हजार 821 मेगावॅट होते. यात 4 हजार 804 मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचा समावेश होता. आज 9 मार्च 2021 रोजी एकूण (पिक) वीज उत्पादन 10 हजार 445 मेगावॅट असून यात 7 हजार 991 मेगावॅट औष्णिक वीजेचा समावेश आहे. डॉ. राऊत यांनी पदभार स्वीकारल्यावर औष्णिक वीज उत्पादन जवळपास दुपटीने वाढले आहे तर एकूण वीज उत्पादन हे जवळपास 4 हजार मेगावॅटने वाढले आहे.
” या सर्व प्रयत्नामुळे आणि सतत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवल्याने आज राज्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक वीज निर्मितीचा विक्रम रचला गेला याचा मला खूप आनंद होत आहे. हा इतिहास रचणाऱ्या महानिर्मितीतील सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ यांचे विशेष अभिनंदन,” अशा शब्दात ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आनंद व्यक्त केला.
“वीज निर्मितीसाठी प्रभावी इंधन व्यवस्थापन, इंधनाचा आवश्यक तो साठा करणे, वीज निर्मिती संचात बिघाड झाल्यावर लगेच दुरुस्ती करणे आणि संचात बिघाड होण्याची वेळच येणार नाही अश्या पद्धतीने ऑपरेशन आणि मेंटेनन्स करणे यावर सातत्याने भर दिला. याशिवाय वीज उत्पादन खर्च कमी करण्याचे ही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून आज सुखद परिणाम दिसू लागले आहेत,” असेही डॉ. राऊत म्हणाले.
• महानिर्मितीचा चढता आलेख…
मार्च महिन्यात राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीची कामगिरी अधिकाधिक उंचावत आहे. 5 मार्च रोजी राज्यातील 9 औष्णिक वीज निर्मिती केंद्रांनी किमान 90 टक्के वा त्याहून प्लांट लोड फॅक्टर प्राप्त करून विक्रम रचला. यापूर्वीचा 20 मे 2019 रोजीचा 10,098 मेगावॅटचा उच्चांक मोडताना महानिर्मितीने आधी 10,275 मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली व त्यात सातत्य राखत 9 मार्च रोजी दु 4.40 वाजता स्वतःचाच विक्रम मोडून 10,445 मेगावॅट वीजनिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
यामध्ये औष्णिक वीज निर्मितीद्वारे 7991 मेगावॅट , वायू वीज निर्मिती केंद्राद्वारे 264 मेगावॅट तर जल विद्युत केंद्राद्वारे 2138 मेगावॅट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून 50 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यात आली आहे . या वेळी महावितरणची विजेची मागणी 22,129मेगावॅट होती तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती 16,429 मेगावॅट इतकी होती. 10,000 मेगावाट पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. 8 मार्च रोजीही महानिर्मिती ने 10,097 मेगावॅट निर्मिती साध्य केली होती.