अंबरनाथमध्ये चहाच्या उधारीवरुन एकावर तलवारीने केले वार, केल गंभीर जखमी.
अंबरनाथ,दि.10 मार्च:- चहाच्या उधारीवरुन चहावाल्याशी हुज्जत झाल्यानंतर भांडण सोडवायला आलेल्या व्यक्तीवरच तलवारीने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या भास्करनगर परिसरात ही घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अंबरनाथ येथील भास्कर नगरमधील कटप्पा चौकात नागोरी हे चहाचं दुकान आहे. या दुकानात तबरेज आणि समीर मोईद्दीन शेख हे दोघे चहा पिण्यासाठी आले होते. यावेळी चहावाला सलाम याने उधारी बंद केल्याचं सांगत त्यांना चहा द्यायला नकार दिला. त्यावरुन या दोघांनी सलाम याच्याशी वाद करायला सुरुवात केली.
यावेळी तिथे असलेल्या समीर आसिफ मोमीन या तरुणाने भांडणं सोडवायचा प्रयत्न केला. मात्र तबरेज आणि समीर शेख यांनी तलवारीने समीर मोमीन याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात समीर मोमीनला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तबरेज आणि समीर शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.