सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्या सोबत युती न करण्याचा रिपब्लिकन पक्ष खोरिपाचा निर्णय
नागपूर: मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सवलती,सरकारी नोकरीतील साडेचार लाखांचा अनुशेष,बढतीतील आरक्षण, खाजगीकरण, कंत्राटीकरण,कोतवालांना चतुर्थ श्रेणी नाकारणे, अनुसूचित जाती जमाती होणारे अन्याय अत्याचार, अनुसूचित जाती जमातीच्या विकासाचा निधी इतरत्र वळविणे, गगनाला भिडणारी महागाई आदी विविध प्रश्न राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भाजप यांनी प्रलंबित ठेवले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा उदोउदो करायचा मात्र मागासवर्गीयांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची नाही अशी दुटप्पी भूमिका ह्या प्रस्थापित पक्षांची आहे त्यामुळे त्यांच्या सोबत युती न करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या आज नागपुरात झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात येत्या काळात महानगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत ह्या निवडणुकीसाठी उपेक्षित समाज घटकांना तसेच त्यांच्या पक्ष, संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे ह्या समविचारी पक्ष संघटना बरोबर रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत यावेळी आप, विदर्भ राज्य निर्माण कृती समिती आणि एम आय एम बाबत युतीची चर्चा होऊ शकते असे ठरले.
रिपब्लिकन पक्ष खोरिपा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा देशक खोब्रागडे, राष्ट्रीय संघटक मा उत्तमराव गवई , राष्ट्रीय प्रवक्ते मा एन व्हि ढोके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, सरचिटणीस जीवन बागडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे