महाराष्ट्र कोरोनाची स्थिती गंभीर, महाराष्ट्रात पुन्हा संपुर्ण लॉकडाउन? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत.
मुंबई:- राज्यात करोना सगळीकडे वाढतो आहे. आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आलो आहोत. आवश्यकता भासल्यास आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले असल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा लॉकडाऊनचे ढग घोंगावण्यास सुरुवात झाली आहे . नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळआले आहे तर इतरही ठिकाणी जिथे कोरोना वाढत आहे तिथे लॉकडाऊन होण्याचे संकेत आहेत .
मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाबाबत धोक्याचा इशारा दिला. करोनाचा धोका वाढत चालला आहे. राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 2 हजारापर्यंत तर मुंबईत 300 पर्यंत खाली आली होती. मात्र गेल्या काही दिवसांत हा आकडा वेगाने वाढत आहे. राज्यात 12-13 हजार नवीन रुग्णांची रोज भर पडत आहे. त्यामुळे नियम पाळले गेले नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
लक्षणे नसलेले रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यात मला लक्षणे नाहीत मग मी बाहेर गेलो तर काय फरक पडतो, अशी काहींची मानसिकता आहे. यातून कुटुंबच्या कुटुंबं बाधीत होत आहेत. यात कुटुंबातील एखाद्याची प्रकृती अधिक बिघडली तर काय संकट ओढवेल याचा विचार करा. इतका निष्काळजीपणा दाखवू नका, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
गेल्या फेब्रुवारीत महाराष्ट्रात करोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर या फेब्रुवारीत करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आता पुन्हा तसाच उद्रेक टाळायचा असेल तर आपल्याला केवळ प्रार्थना नव्हे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे करोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले.
नियमावली येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनवर बोलताना त्यांनी पाश्चिमात्य देश व ब्राझीलचा दाखला दिला. पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असते हे स्पष्ट झालेले आहे. पाश्चिमात्य देशात थेट महिना-दोन महिने असा लॉकडाऊन लावावा लागला आहे.
ब्राझीलमध्ये करोनाचा हाहाकार सुरू आहे. ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी आपल्याला खबरदारी बाळगायची आहे. मला लॉकडाऊन होऊ द्यायचे नाही पण नियम पाळले गेले नाहीत तर पर्याय उरणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.