चांद्रयान ३ मोहिमेसाठी शुभेच्छा !

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

आज म्हणजे १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी भारताचे यान चंद्राकडे झेपावेल आणि इतिहास घडेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत चंद्रावर स्वारी करणार यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसेल. भारताची ही चांद्र मोहीम चांद्रयान – ३ या नावाने ओळखली जाईल. याआधी भारताने दोनदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तो अपयशी ठरला. २००८ साली चांद्रयान १ या मोहिमेस इस्रोने सुरवात केली त्यानंतर चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली चांद्रयान २ मोहिमेतील यान चंद्राच्या कक्षेत पोहचूनही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विसंगतीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यास अपयशी ठरले होते. अर्थात चांद्रयान २ पूर्णपणे अपयशी ठरले असेही म्हणता येणार नाही कारण चांद्रयान २ मोहिमेवेळी पाठवलेले ऑरबीटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. या ऑरबीटरवरील काही उपकरणे वापरून चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास केला जात आहे. तसेच चंद्र व त्याच्या वातावरणाविषयी नवी वैज्ञानिक माहिती अपल्याला मिळत आहे.

चांद्रयान ३ हा आधीच्या म्हणजे चांद्रयान २ , मोहिमेचाच भाग आहे. गेल्या वेळी जेंव्हा आपल्याला या मोहिमेत अपयश आले तेंव्हा यानाचा संपर्क तुटला होता म्हणून केवल संपर्क तुटा है…. हौसला नहीं! असे म्हणत देशातील १४० कोटी जनता शास्त्रज्ञांच्या ठामपणे उभी राहिली. देशातील जनतेला देशातील शास्त्रज्ञांविषयी कमालीचा आदर आणि विश्वास आहे याच विश्वासाच्या बळावर आपल्या शास्त्रज्ञांनी आलेले अपयश विसरून नव्याने सुरवात केली. गेल्या वेळेच्या मोहिमेच्या अपयशातून धडा घेत यावेळी शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. यानातील काही घटक ऐनवेळी कार्यन्वित होऊ शकले नाही तरी यान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल अशी नव्या यानात रचना करण्यात आल्याची माहिती इस्रोचे संचालक एम सोमनाथ यांनी दिली आहे. सेन्सर निकामी होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे, संगणकातील नियमसंच व गणितीय प्रक्रिया यात होणाऱ्या चुकांची तपासणी करून त्याचे निराकरण करणे यासारख्या बाबींचा विचार करूनच हे यान चंद्रावर झेपावणार आहे त्यामुळे यावेळी आपले यान चंद्रावर उतरेलच असा विश्वास देशातील १४० कोटी जनतेला आहे.

चांद्रयान ३ मोहीम ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. जर भारताचे हे यान चंद्रावर उतरले तर चंद्रावर यान उतरवण्यात यशस्वी ठरलेल्या काही मोजक्या देशात भारताचा समावेश होईल. या मोहिमेद्वारे आपल्या देशातील विकसीत तंत्रज्ञान जगाला दाखवण्याची संधी मिळेल. अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. ही मोहीम यशस्वी झाली की भविष्यात चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकार होईल. भारत अंतराळ क्षेत्रात एक महासत्ता म्हणून उदयास येईल एकूणच भारताच्या अंतराळ क्षेत्रात चांद्रयान ३ मोहीम हा मैलाचा दगड ठरणार आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. गेली चार वर्षे रा शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे. त्यांच्या या मेहनतीला यश मिळेल आणि आपली ही चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होईल यात शंका नाही. चांद्रयान ३ मोहीमेसाठी शास्त्रज्ञांना मनापासून शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here