JSW स्टील डोलवी – रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात ‘सिंहाचा वाटा

JSW स्टील डोलवी – रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात ‘सिंहाचा वाटा

प्रकल्प विस्तारामुळे रोजगार आणि विकासाला नवी दिशा

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाची ओळख निर्माण करणाऱ्या JSW स्टील डोलवी प्रकल्पाने गेल्या १५ वर्षांत केवळ उत्पादन क्षमता वाढवली नाही, तर स्थानिक रोजगार, सामाजिक विकास, पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांमध्येही भरीव योगदान दिले आहे.

सुमारे १९९२ मध्ये सुरु झालेली इस्पात कंपनी २०१० मध्ये बंद होण्याच्या मार्गावर असताना JSW समूहाने ती विकत घेऊन अल्पावधीतच पुन्हा सुरु केली. त्यानंतर पेण, अलिबाग, रोहा तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. कंपनीचे मालक श्री. सज्जन जिंदाल आणि सौ. संगीता जिंदाल यांनी CSR निधीचा प्रभावी वापर करून गावांचा सर्वांगीण विकास साधला.

२.५ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमतेपासून सुरुवात करून कंपनीने गेल्या १५ वर्षांत १० दशलक्ष टन क्षमतेपर्यंत विस्तार साधला. या प्रकल्पामुळे जिल्ह्याची आर्थिक समीकरणे बदलली. याच काळात सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही JSW ने उल्लेखनीय कार्य केले.

कोविड-१९ संकटाच्या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजन टंचाई असताना JSW डोलवीने राज्यभराला ऑक्सिजन पुरवठा करून सामाजिक दायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. तसेच ७५ गावांना मोफत पाणीपुरवठा ही मोठी सेवा कंपनीने उभारली आहे.

आरोग्य सेवांमध्येही कंपनीने मोठे योगदान देत ‘संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारले. त्यामुळे अलिबाग, मुरुड, रोहा परिसरातील नागरिकांना डायलिसिस, अँजिओग्राफी, सीटी स्कॅनसाठी मुंबईपर्यंत जाण्याची वेळ आता टळली.

सध्या प्रकल्पाचा आणखी विस्तार होत असून यामुळे रोजगाराच्या नव्या संधी आणि वाढीव CSR निधी उपलब्ध होणार आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी प्रकल्प विस्तारासंदर्भातील जनसुनावणी होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केलेल्या पर्यावरण परिणाम अहवालानुसार (EIA) या विस्तारामध्ये HSM, ब्लास्ट फरनेस, लाईम कॅलसिनिंग प्लांट (LCP) आणि ऑक्सिजन प्लांट यांचा समावेश आहे.

दरम्यान, काही ठिकाणी प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. कंपनीने स्पष्ट केले आहे की प्रस्तावित विस्तारामध्ये कोक ओव्हन प्लांटचा समावेश नाही. सुजाण नागरिकांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन, औद्योगिक विकासाला पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचे स्थानिक औद्योगिक वर्तुळांचे मत आहे.