महाशिवरात्रीला खाल्ला साबुदाणा, घशात अडकल्याने 11 वर्षांच्या मुलाचा गुदमरून मृत्यू.
✒सोलापुर जिल्हा प्रतिनिधी✒
सोलापुर 13 मार्च:- जिल्हातुन एक दुर्दवी आणि मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. अकरा वर्षांच्या एका मुलाच्या घशात अन्नाचा घास अडकल्याचं निमित्त झालं आणि त्यात त्याचा जीव गेला. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वडाची वाडी इथली ही घटना आहे. महाशिवरात्रीच्याच दिवशी अन्नाचा घास घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगा जेवत असताना अन्नाचा घास त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला ठसका लागला आणि श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येऊ लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला माढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण तत्पूर्वी त्याचा जीव गेला होता. या 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 11 वर्षीय मृत मुलाचं नाव रोहन सिद्धेश्वर निळे असं असून तो माढा तालुक्यातील वडाची वाडी येथील रहिवासी आहे. रोहनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा दिव्यांग होता. त्याला अधून मधून झटकेही येत होते. गुरूवारी महाशिवरात्री निमित्त घरात साबुदाना करण्यात आला होता. या मुलाने दुपारी 4 च्या सुमारास हा साबुदाना खाल्ला होता. मात्र जेवणानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला माढ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर त्याची रवागनी माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.