जिल्हाधिका-यांकडून विविध ठिकाणी भेट, लसीकरणाचाही आढावा
कृषी पूरक लघु उद्योगांना चालना देणे आवश्यक
: जिल्हाधिकारी पवनीत कौर
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
अमरावती : – ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी कृषी पूरक व्यवसाय व लघुउद्योग यांना चालना मिळणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज भातकुली येथे दिले.
जिल्हाधिका-यांनी आज उत्तमसरा येथील बांबू लागवड केंद्राला व तलाठी कार्यालयाला भेट दिली. त्याचप्रमाणे भातकुली येथील डाळ मिललाही भेट देऊन प्रक्रिया जाणून घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात डाळ मिल आदी उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
लसीकरणाचा आढावा
कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज भातकुली ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिका-यांची सभा घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश दिले. तहसील यंत्रणेच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी घेतला. लसीकरणाला गती मिळणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.