गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं अनुभवाच्या जोरावर पी. व्ही. सिंधूला २-० नं नमवून सुवर्णपदक जिंकलं. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं असून तिला रौप्यपदक मिळालं. या पदकासह भारताच्या खात्यात एकूण ६२ पदके जमा झाली आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सायनाचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला एकेक गुण मिळवण्यासाठी झुंझावं लागलं. तर सायनानं संपूर्ण अनुभव पणाला लावत पहिला सेट २१-१८ अशा गुणफरकानं जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूनं ‘वापसी’ केली. तिनं सायनालाही झुंजवलं. अखेर २३-२१ अशा गुणफरकानं दुसरा सेट जिंकून सायनानं सुवर्णपदकाला गवसणी घातली.