कसली दिवाळी, सर्वसामान्य करताहेत पोटापाण्यासाठी संघर्ष.
वर्धा :- राज्यात मार्चपासून कोरोना महामारीनै थैमान घातले आहे. परीणामी अनेकांचे रोजगार गेले. कित्येक बेरोजगार झाले. शेतकरी वर्गही नगदी पीक सोयाबीनवर आलेल्या रोगांमुळे बेजार झाले. हातचे उत्पन्न गेले. कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे विवंचनेतच आहे. कपाशीही दगा देणार असल्याचे चित्र आहे. त्यातही भावबाजी अशा विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर दसरा झाला. आता दिवाळी आली घरी. मुलं बाळं आईला विचारतात बाबा दिवाळीसाठी नवीन कपडे लाडू, चिवडा, अनारसे कधी करायचे असे ऐकून मन सुन्न होते. काय द्यायचे उत्तर. कसला लाडू अन् कसली करंजी आता संघर्ष पोटापाण्याचा अशी वेळ सर्व सामान्य कुटुंबाची झाली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात शहरातून ग्रामीण भागाकडे लोकांनी प्रस्थान केले होते. यामुळे प्रत्येकाचे घरात मनुष्य बळ वाढले होते. उत्पन्न बंद होते. हाताला काम नाही.
अशात महत्त्वाच्या दसरा, दिवाळी सणाचे आगमण, गोरगरिबांचे घरी सणावारालाच तोंडाला गोडधोडीची चव चाखायला मिळते. यंदा मात्र कोरोनामुळे गोरगरिबांचे तोंडाला पाने पुसली गेली असल्याचे चित्र ग्रामीण सह शहरी भागात पहावयास मिळते आहे.
गावचे दुकानातून उधारीवर दिवाळी सणासाठी कपडे लत्ते, किराणा घ्यायचा तर आधीच उधारी थकलेली असल्याने दुकानदार देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.