मुंबईत सुरु होणार वॉटर टॅक्सी

प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु

मुंबईत सुरु होणार वॉटर टॅक्सी

नंदलाल एस. कन्नाके
मो.नं. 7743989806

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा (Water Taxi in Mumbai) मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन उद्या दि. १७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे,अशी माहिती राज्याचे बंदरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री अस्लम शेख म्हणाले, बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी रु.८०० ते रु. १२०० तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी रु २९० इतके ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे ८.३७ कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले असून केंद्र आणि राज्य शासनामार्फत ५० : ५० प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

वॉटर टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबईत निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे. नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सेवा मिळणार असल्याने पर्यटनालासुद्धा चालना मिळणार आहे, असा विश्वासही मंत्री महोदयांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here