काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तसंस्थेने केला लेख प्रकाशित, मोदी प्रशासन आणि बीजेपीच्या द्वेषाच्या आणि धर्मांधतेच्या राजकारणावर केली प्रखर टीका
मनोज कांबळे
१६ एप्रिल, मुंबई: आपल्या लेखातून भारतातील सद्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना सोनिया गांधी विचारतात, कि आपल्या देशाला सतत द्वेष आणि भेदभावाच्या वातावरणात राहणे गरजेचे आहे का? सध्याच्या सत्ताधारी पक्षाला (भाजप) मात्र देशाला अशा धोकादायक वातावरणात ठेवणे योग्य वाटते. भाजप त्यांच्या राजकीय फायद्यासाठी देशातील नागरिकांना कपडे, अन्न, धर्म आणि भाषा यांच्या आधारावर एकमेकांसोबत लढवत आहे. नागरिकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करणार्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. इतिहासाला चुकीच्या पद्धतीने मांडून त्याद्वारे लोकांमधे संताप, बदल्याची भावना निर्माण केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सोनिया गांधी म्हणतात कि, पंतप्रधान भारताच्या विविधतेबद्दल आपल्या भाषणातून खूप बोलत असतात. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे कि, त्यांच्या कार्यकाळात विविधतेने नटलेल्या भारतीय समाजातील घटकांचा वापर समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी केला जात असून सामाजिक असंतोषाची परिस्थिती तशीच जाणूनबुजून चिघळत ठेवण्यात येत आहे.
देशातील लोकांमध्ये आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी देशाचा आर्थिक वृद्धीचा दर वाढण्याची गरज आहे. परंतु देशातील बिघडलेल्या सामाजिक सलोख्यामुळे देशाची आर्थिक परिस्थती देखील मोडकळीस आली आहे.
देशातील जनतेला स्वतःच्या फायद्यासाठी कायमस्वरूपी द्वेष आणि संतापाच्या भावनेत ठेवण्याची मोठी योजना आखली जात आहे. सोशल मीडियाचा वापर खोटी माहिती आणि लोकांच्या मनांत द्वेषाचे विष पेरण्यासाठी केला जात आहे. देशातील अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करणाऱ्यांचा गौरव केला जात आहे. सामाजिक सुधारणेचे विचार मांडणाऱ्या लोकांविरोध खुलेआमपणे शाब्दिक,शारीरिक हल्ले केले जात आहेत. या साऱ्या अन्यायाविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? या घटनांतील आरोपींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई का करत नाहीत? अशा शब्दात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना जाब विचारला आहे.
द्वेष, संताप, भेदभाव आणि खोटेपणाची एक भयानक आपत्ती आपल्या देशाला कवेत घेत आहे. या आपत्तीला आपण आज थांबवले नाही तर, आपल्या समाजाचे सुधारण्यापलीकडचे नुकसान होईल. खोट्या देशभक्तीखाली आपल्या देशाची लावली जाणारी विल्हेवाट आपण नुसती बघत बसू शकत नाही. हि द्वेषाची त्सुनामी आपल्याला थांबवायची आहे, असे आवाहन सोनिया गांधींनी देशाच्या नागरिकांना करत लेखाची समाप्ती केली आहे.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचल्यात का?
- WhatsApp Updates: व्हाट्सअप मध्ये करण्यात आले मोठे बदल, काय आहेत नवीन फीचर्स?
- राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या सन २०२० मध्ये महिला अत्याचाराच्या बाबतीत ३१ हजार ९५४ गुन्ह्यांची नोंद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही…