सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करा: पुरसलगोंदी ग्रामपंचायत चा ठराव.
ग्रामसभेला अंधारात ठेवल्याच्या आरोप; तहसिलदारामार्फत खासदार,आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन.

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली/गडचिरोली:- तालुक्यातील पुरसलगोंदी ग्रामपंचायत हद्दीतील हेडरी गावाजवळील सुरजागड पहाडीवर सुरू असलेले लोहदगड उत्खननाचे काम ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून सुरू करण्यात आले. कुठलीही मंजुरी घेण्यात आली नाही. त्यामुळे सुरू असलेले काम तात्काळ बंद करावे असा ठराव पुरसलगोंदी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला. या संदर्भात १४ मे रोजी तहसीलदारामार्फत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.
निवेदनात म्हटले आहे की २८ एप्रिल २०२१ रोजी पुरसलगोंदी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीला शासनाने सुरजागड पहाडावरील लोहदगड उत्खनन करून वाहतूक करण्यास मंजुरी दिली. परंतु शासन व कंपनीने कायदेशीर पूर्वपरवानगी घेतली नाही.वनसंवर्धन अधिनियम १९८० व पर्यावरण अधिनियम १९८६ चे अनुपालन करण्यात आले नाही. व तसेच पुनर्वसन आराखडा व इतर कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता ग्रामसभा व स्थानिक लोकांना अंधारात ठेवून मंजुरी दिली.
आदिम जमातीची संस्कृती व नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याकरिता सुरजागड येथे सुरू असलेले लोहखनिज उत्खननाचे काम लवकर बंद करावे,असा ठराव पुरसलगोंदी येथे घेण्यात आला. ग्रामसभेच्या ठरावातील सर्व मुद्यांच्या विचार करून उत्खननाचे काम बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना निवेदन देतांना उपसरपंच राकेश कवडो, ग्रामपंचायत सदस्य मधुकर सडमेक, दयालु कुजूर, अजय सडमेक, निर्मला गुंडम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.