महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरण भोवल.

अमरावती: वाहन अडवून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह वाहनचालक व दोन कार्यकर्त्यांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. दरम्यान, अॅड. ठाकूर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

अॅड. यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह २४ मार्च २०१२ रोजी दुपारी ४.१५ वाजता चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यावर कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडविले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास चालकास मनाई केली. त्यावर ॲड. ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद जवंजाळ व राजू इंगळे यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला. कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याची तक्रार रौराळे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांच्या न्यायालयाने पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यातील एक साक्षीदार फितूर झाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश जोशी-फलके यांनी ॲड. यशोमती ठाकूर तसेच सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी फितूर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले. सरकारी पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी बाजू मांडली.

उच्च न्यायालयात दाद मागणार अॅड. यशोमती ठाकूर

न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकेच सांगू शकते की, विजय शेवटी सत्याचाच होईल, अशी प्रतिक्रिया अॅड. यशोमती ठाकूर यांनी निकालानंतर दिली. त्या म्हणाल्या, भाजपसोबत माझी वैचारिक लढाई आहे. मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील, असेही त्या म्हणाल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here