अपत्यप्राप्ती होत नसल्याने नैराश्यात ऐन दिवाळीत दाम्पत्याची आत्महत्या.

 गडचिरोली:- मुलचेरा नाना प्रकारचे उपचार, प्रयत्न करूनही वंशाचा दिवा मिळाला नाही. पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून नैराश्‍यग्रस्त झालेल्या मुचलेरा तालुक्‍यातील श्रीनगर गावातील एका दाम्पत्याने घरीच गळफास लावून आत्महत्या केली. बिप्रजीत विभूती गाईन वय 25, जमुना बिप्रजीत गाईन वय 23, असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, श्रीनगर गावातील रहिवासी गाईन दाम्पत्य हे मागील काही महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. दोन वर्षांपूर्वी बिप्रजीत व जमुना यांचा विवाह झाला व या नवीन दाम्पत्याने आपल्या संसारास सुरुवात करून आनंदमय जीवन जगत होते. त्यानंतर गाईन दाम्पत्य घरी एक लहान बाळ येणार, अशी आशा बाळगून होते. मात्र, दोघांच्या नशिबात अपत्याचे सुख नव्हते. दोघांनीही पुत्रप्राप्तीसाठी सगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या. मात्र, अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोघेही पती-पत्नी निराशपूर्ण जीवन जगत होते.

दरम्यान, दिवाळी केवळ तीन दिवसांवर असताना गाईन दाम्पत्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या स्वत:च्या घरीच गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळ उघडकीस आली. या घटनेमुळे श्रीनगर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची तक्रार मुलचेरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास मुलचेरा पोलिस करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here