यवतमाळ जिल्हात दुचाकी वाहनचोरीचे प्रमाण वाढले.
✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ, दि 17 मार्च:- यवतमाळ मध्ये माघिल अनेक दिवसांपासून वाहनचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोलिसांना एकप्रकारे आव्हान देऊन अवघ्या काही दिवसांत एक-दोन नव्हे, तर तब्बल 20 दुचाकी चोरांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे यवतमाळकरांनी सावध राहण्याची गरज आहे. शहरात दुचाकी वाहनचोरांची टोळी सक्रीय झाली आहे. मात्र, या चोरांवर अंकुश मिळविण्यात पोलिस विभागाला हवे तसे यश आलेले नाही.
शहरात वाहन चोरीच्या घटना घडतच आहेत. बहुतांश यवतमाळ शहर व अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून चार वाहने चोरीला गेली आहेत. पोस्टल मैदानातून संध्याकाळी फिरणार्या युवकाचे वाहन चोरीला गेले. ही बाब लक्षात येताच त्याचा पाठलाग केला गेला. मात्र, यातील चोर महादेव मंदिर मार्गाने पसार झाला. हा चोर सीसीटीव्हीतसुद्धा आला आहे.
अशाच पद्धतीने आकृती प्लाझा येथून 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजता मोटारसायकल चोरीला गेली. त्यानंतर आठवडाभराने शहर पोलिसांनी वेणी कोठ्याच्या युवकाला अटक केली. त्याच्याकडून वाहन तोडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र, या टोळीचा मास्टरमाईंड जावेद अद्यापही फरारच आहे. त्याच्या माध्यमातून वाहनचोरांच्या टोळीचा छडा लागेल, अशी अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांत शहरातून तब्बल 20 वाहने चोरीला गेल्याने यवतमाळात वाहन चोरांची टोळी सकि‘य असल्याचे दिसून येते. मात्र, या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिस स्तरावरून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.