साहेब जाणार…दादा येणार? शरद पवारांच्या आशीर्वादाची प्रतीक्षा; नव्या दाव्याने खळबळ

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी

मो: 9284342632

मुंबई – राज्यात लवकरच सत्तांतर होणार असल्याची कुजबूज सुरू असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार हे शपथ घेऊ शकतात.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता आणखी एका दाव्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) चा एक गट भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, या आघाडीला शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला नाही.

2019 मध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ता स्थापनेचा प्रयोग फसला होता. त्यावेळी 80 तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अजित पवार हे सक्रीय झाल्याची चर्चा सुरू असताना हे वृत्त समोर आले आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनुसार, भाजपसोबतच्या या आघाडीला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मात्र, पवार हे भाजपसोबत जाण्यास उत्सुक नाहीत. भाजपसोबत आघाडी करून शरद पवार यांना राजकीय कारकिर्दीत उजव्या शक्तींसोबत जाण्याचा कलंक लावून घ्यायचा नाही, असे . ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे. शरद पवार हे अजूनही जनभावना बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पवार यांच्या पाठिंब्यासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांनी स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. अजित पवार यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असल्याचे म्हटले जात आहे.

 

भाजपसाठी अजित पवार ठरणार संकटमोचक?

पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 33 जागा मिळतील, असा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, असे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्राच्या हवाल्याने सांगितले. भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे. जेणेकरून राज्यातील 35 टक्के मराठा मतदारांवर प्रभाव पाडता येऊ शकतो. अजित पवार यांच्या मार्फत हा मतदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. 

 

खातेवाटप ठरलं?

 ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. 8 एप्रिल रोजी अजित पवार हे अचानक नॉटरिचेबल झाले होते. त्यावेळी अजित पवार हे खासगी विमानाने दिल्लीत गेले होते. त्यावेळी गृहमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटले आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत खातेवाटपावरही शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात केला आहे. 

 

प्रफुल्ल पटेल सूत्रधार

या नव्या आघाडीचे सूत्रधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे सूत्रधाराची भूमिका बजावत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत नव्हते. 

 

संजय राऊत यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या

भाजपकडून आता राष्ट्रवादी फोडण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. यासर्व चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’मधील ‘रोखठोक’मधून केलेल्या दाव्यावरून पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी फोडण्याचा सीझन-2 आल्याचा टोला लगावला आहे.  

 

एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेईमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले असल्याचे संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here