*बचतगटांनी योजनेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करावी :पालकमंत्री अशोक चव्हाण*
*मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण*

*मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
नांदेड :- औजारे बँकेचा लाभ घेतलेल्या महिला बचतगटांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मानव विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत जिल्ह्यातून 13 महिला शेतकरी गटांची निवड करण्यात आली आहे. याअनुषंगाने लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील जयकिसान महिला शेतकरी गट व मुदखेड तालुक्यातील निवघा येथील श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते चाब्या देऊन या उपक्रमाचे लोकार्पण नांदेड येथे नुकतेच करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमर राजुरकर , आ. बालाजीराव कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) थोरात, सर्व गट प्रमुख व कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रति प्रकल्प किंमत 19 लाख 38 हजार असून 75 टक्के अनुदान महिला गटांना कृषि विभागामार्फत देण्यात येणार आहे. औजारे बँक प्रकल्पात ट्रॅक्टर, ट्रॉली, मळणीयंत्र, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पलटी नांगर, लॅड लेव्हलर आदी औजारे व औजारांसाठी शेड याबाबी समाविष्ट आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषि विभागास 2 कोटी विशेष निधी मंजूर केला आहे.