धान उत्पादकांसाठी परतीचा पाऊस धोक्याचा
हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट १८/१०२१
जिल्ह्यातील शेतकर्यांनी प्रतिकुल स्थितीत जिवाचे रान करून धानपीक जगवले. आता कमी कालावधीचे धानपीक कापणीला आले असताना हवामान विभागाने जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. या इशार्याने धान उत्पादकांच्या हृदयात धडकी भरवली आहे. मागील काही दिवसांपासून अचानक कोसळत असलेला पाऊस आणि भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यासह विदर्भात १७. १८ ऑक्टोबर या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य धोके लक्षात घेता जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक उपाययोजना व विभागाकडील शोध आणि बचावपथक, बचाव साहित्य आदी सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या. या काळात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाने झोडपल्याने धानपीक शेतात आडवे झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार खूप मुसळधार पाऊस अद्याप जिल्ह्यात झालेला नाही. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे.
या परतीच्या पावसाने उग्र रूप धारण केले, तर आपल्या पिकाचे काय होणार, अशी चिंता शेतकर्यांना सतावत आहे. बळीराजावर अनेक संकटे त्यातही शेतकर्यांच्या धानपिकाचे किडींचा प्रादुर्भाव व वादळी पावसामुळे काही भागामध्ये मोठे नुकसान झाले आहे.