रेल्वे कर्मचाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी; शिक्षिकेची हरवलेली बॅग मौल्यवान वस्तूसहित दिली शोधून
विशाल गांगुर्डे, मुंबई
१८ डिसेंबर, मुंबई: लोकल ट्रेनने प्रवास करताना आपला मोबाईल, मौल्यवान वस्तू किंवा बॅग हरवल्यावर पुन्हा मिळण्याची शक्यता धूसर असते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन आणि अनेकदा हेलपाटे मारूनही बॅग मिळत नाही. त्यामुळे अनेकजण हरवलेल्या वस्तूबद्दल आशाच सोडतात. मात्र, एका शिक्षिकेची बॅग रेल्वे कर्मचाऱ्याने चोवीस तासांच्या आत शोधून दिली आहे. या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कामगिरी आणि मदतीचे कौतुक आहे.
शिक्षिका छाया प्रभाकर आहिरे या घाटकोपर स्टेशनवरून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होत्या. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.४४ वाजताची ठाण्याकडे जाणारी ट्रेन पकडली. या ट्रेनने प्रवास करताना गर्दीमुळे त्यांची बॅग ट्रेनच्या ट्रॅकवर पडली. रात्रीच्या अंधारात ही बॅग मिळण्याची शक्यता धूसर होती. तर कोणी अज्ञात व्यक्ती देखील ही मौल्यवान वस्तू असलेली बॅग लंपास करण्याची शक्यता होती.
छाया आहिरे यांनी सदर माहिती घाटकोपर रेल्वे स्थानकातील कर्मचारी संजय शांताराम जाधव यांना कळवली. त्यांनी छाया आहिरे यांच्या बॅगची पूर्ण माहिती नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल करून बॅग त्यांच्याकडे सोपविली. त्यांच्या कामगिरीचे आहिरे कुटुंबाने कौतुक करत सत्कार केला. रेल्वे कर्मचारी संजय जाधव यांच्या कामगिरीचे कार्यालयीन वर्तुळातही कौतुक होत आहे.