तिवसा शहरासाठी 0.678 दलघमी पाणी आरक्षित* *पेयजलाची दीर्घकाळापर्यंत मुबलक उपलब्धता राहील:पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर*

57

*तिवसा शहरासाठी 0.678 दलघमी पाणी आरक्षित*
*पेयजलाची दीर्घकाळापर्यंत मुबलक उपलब्धता राहील:पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर*

 

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

अमरावती: -उर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी 0.678 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तशा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे तिवसा शहराचा पेयजलाचा प्रश्न कायमस्वरुपी संपून, दीर्घकाळापर्यंत पेयजलाची उपलब्धता राहणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

उर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीसाठी 0.678 दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजुरी मिळण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तिवसा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 0.678 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. तिवसा शहराची सन 2038 ची अंदाजित लोकसंख्या विचारात घेऊन पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची हक्क मंजूर झाल्याने पेयजलाचा प्रश्न संपुष्टात येण्याबरोबरच दीर्घकाळ पाण्याची उपलब्धता राहणार आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांच्याकडून पिण्याच्या पाणी आरक्षणापोटी सिंचन पुन:र्स्थापना खर्च घेतला जाणार नसल्याचे निर्णयात नमूद आहे. तिवसा नगरपंचायतीने संपूर्ण सेवा क्षेत्रात बंदिस्त नलिका मल:निसारण प्रणाली व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेसोबतच तयार होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल. राज्य जल परिषदेच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कमीत कमी 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करून ताज्या पाण्याची गरज कमी करण्याचेही शासनाचे निर्देश आहेत. कोणत्याही वर्षासाठी पाण्याचा वास्तविक कोटा त्या वर्षाच्या 15 ऑक्टोबर रोजी स्त्रोत जलाशयाच्या पाण्याची साठवण स्थिती व निश्चित केलेल्या तूट वाटण्याची सूचनेनुसार नदी खोरे अभिकरणाद्वारे निश्चित केला जातो.

निकषांनुसार आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल. आवश्यक तिथे पुरेसा निधी उपलब्ध करुन जाईल. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.