वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याना दणका
जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकाकडून 76 लाखाचा दंड वसूल
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९३
अलिबाग: वाहतुकीचे वेगवेगळे नियम मोडणाऱ्याना पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे.आठ महिन्यात १० हजार 554 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली.यामध्ये 76 लाख 51 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला आहे.वाहतूक पोलिसांसह ,पोलीस ठाणे स्तरावर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर अपघातही वाढत चालले आहेत. पूर्वी अपघाताला खराब रस्ते हे मुख्य कारण असे परंतु अलीकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होत आहेत. नशेत वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, सीट बेल्ट वापर न करणे, आदीमुळे अपघात घडतात. वाहन चालवताना नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगरतात .एकदा कारवाई झाली तर पुढच्या वेळी पुन्हा ती चूक वाहनधारक करणार नाही अशी शक्यता असते. पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईचा परिणाम चांगला होतो.
रायगड जिल्ह्यात तब्बल दहा हजार 554 वाहन चालकांनी नियम मोडल्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईतून 76 लाख 51 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या चालकांवर प्रत्यक्ष आणि ई -चलन च्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. आठ महिन्यात 237 चालकांना मोबाईलवर बोलताना पकडून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख 57 रुपयांचा दंड आकारला. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे .नियमांचा भंग केल्यास अपघात होऊ शकतात. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे असे वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.
कोणत्या प्रकारात किती
दंड वसूल ?
वाहतूक पोलिसांनी मोबाईलवर बोलणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर ट्रिपल सीट, दारूच्या नशेत वाहन चालवणे, वेगाची मर्यादा ओलांडणे, नो -पार्किंग मध्ये वाहन लावणे ,सीट बेल्टचा वापर न करणे, नो एन्ट्री मध्ये घुसखोरी, फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन पाल्याला दुचाकी देणे,आदी कारवाया केल्या आहेत. सर्व प्रकारच्या कारवायातून जवळपास 76 लाख 51 हजार शंभर रुपये दंड वसूल केला आहे.