चंद्रपूर कृउबा समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचा समावेश, वर्धा व इरई नदी संगमावरील घटना
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
विसापूर, (चंद्रपूर), 19 नोव्हेंबर:मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनासाठी वर्धा-इरई नदीच्या संगमावर गेलेले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदा पोडे यांचा त्यांचा मुलगा व भाच्यासह बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याची ही घटना रविवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील रहिवासी गोविंदा पोडे ( 47), चेतन गोविंदा पोडे ( 16 ) व गणेश रवींद्र उपरे ( 17) अशी मृतकांची नावे आहेत. गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे 11 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी रविवारी वर्धा-इरई नदीच्या संगमावर गेले होते. नदी पात्रात आंघोळ करीत असताना मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते. त्यांना वाचविण्यासाठी उपसभापती यांनीही नदी पात्रात उडी घेतली. शेवटी त्या तिघांचीही जलसमाधी झाली. गोविंदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचेदेखील माजी सभापती होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यांसमोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आह. दरम्यान, शोध मोहिमेत सायंकाळी 5.45 वाजता चेतन पोडे, त्यानंतर गणेश उपरे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अन्य एकाची शोध मोहीम सुरु होती.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतिशसिंह राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.